यावर्षी १० सप्टेंबरला गणपती उत्सव आहे. चाकरमान्यांची आतापासूनच लगबग सुरू झाली आहे. सर्वात पहिली तयारी म्हणजे रेल्वेची तिकिटे आरक्षण करणे. गणपतीच्या काळामध्ये अनेक अतिरीक्त गाड्या सोडल्या जातात, परंतु कोकणात येणाऱ्यांची संख्या एवढी जास्त असते की, रिझर्व्हेशन काही मिनिटांतच फुल होऊन जातात.
मागील वर्षी कोरोनाचा वाढत प्रभाव बघता, गावातून चाकरमान्यांना येऊ नका, आहात तिथेच राहा असे सांगण्यात आले होते. त्यातही १४ दिवस सक्तीचे क्वारंटाईन, कोरोना टेस्ट इत्यादी गोष्टींची सक्ती केल्याने चाकरमान्यांचा पण नाराजीचा सूर दिसून येत होता. म्हणून यावर्षी गणपतीला गावी जायचे म्हणून २ महिने आधीपासूनच तयारी सुरु केली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण आतापासूनच फुल्ल झाले असल्याचे वृत्त कळत आहे.
वर्षातून एकदा गणेशोत्सवाला गावच्या घरी येणार म्हटल्यावर साफसफाई पासून सर्व करणे आलेच. त्यामुळे साधारण ४ दिवस आधिच गावामध्ये घरी जाऊन पूर्वतयारी, डेकोरेशन केले जाते. परंतु, जून महिन्या मधेच कोकण रेल्वेने ५ ते ९ सप्टेंबर या कालावधीमध्ये गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल झाल्याची माहिती दिली आहे.
अगदी हाथावर मोजण्या इतक्या गाड्यांची काही एसी टू टायर व थ्री टायरच्या काही जागा शिल्लक असल्या तरीही उर्वरित क्लासच्या सर्वच गाड्यांसाठी हजारो प्रवासी अजून प्रतीक्षा यादीवर आहेत. काही जण तर आत्तापासूनच परतीच्या प्रवासासाठीचीही तिकिटे खरेदी करताना दिवसात आहेत. १४ तारखेपासून पुढील आठवड्याचे आरक्षण देखील फुल झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कोकणामध्ये गणपती हा प्रत्येक घरात बसवला जात असल्याने या गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये शहरातील लोक आपापल्या गावच्या घरी जमतात, मागच्या वर्षी पेक्षा यावर्षी कोरोना वाढल्याने आणि तिसऱ्या लाटेची भीती मनात असल्याने रत्नागिरी मध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात येणार असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाच्या प्रमुख हॉटस्पॉटपैकी सध्या रत्नागिरी जिल्हा हा आघाडीवर आहे. त्यामुळे पूर्व नियोजन म्हणून आता रत्नागिरीतील आरोग्य यंत्रणा आधी पासूनच सतर्क राहिलेली आहे.