मुंबई-गोवा महामार्गाचं काम मागील १७ वर्षांहून अधिक काळापासून रखडलेले असतानाही वारंवार त्याच सत्ताधाऱ्यांना तुम्ही कसे काय निवडून देता? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरें यांनी मतदारांना केला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी पनवेलमध्ये निर्धार मेळावा घेतला. यावेळी ते बोलत होते. मनसेच्या आंदोलनाला हिरवा कंदील देण्यासाठी ते या ठिकाणी आले होते. यावेळी बोलताना त्यांनी सर्वच राजकीय पक्षांवर टीका केली. तसेच त्याना सतत निवडून देणाऱ्या मतदारांनाही फटकारले. या रस्त्याच्या बांधकामासाठी किती खर्च झाला, मागील १० वर्षांमध्ये किती जणांचा मृत्यू झाला यासारख्या आकडेवारीसहीत सविस्तर मुद्दे आपल्या भाषणातून मांडले.
दरवेळेस महत्त्वाच्या मुद्याऐवजी निवडणुकीच्या तोंडावर इतर गोष्टींना प्राधान्य देत मतदान केलं जात आणि पुन्हा तेच टेंडर, भ्रष्टाचार, टक्केवारीचं दुष्टचक्र सुरु राहतं असं राज म्हणाले. यावेळेस राज यांनी थेट उल्लेख न करता उद्धव ठाकरे गटाला लक्ष्य केलं. नितीन गडकरी, मुख्यमंत्र्यांनी मुंबई गोवा महामार्ग २०२४ पर्यंत लोकांसाठी खुला होईल असं सांगितलं आहे. याचा मला आनंद आहे. पण आताच्या गणपतीचं काय. आतापर्यंत या मार्गावर २५०० माणसं गेल्या १० वर्षात मृत्यूमुखी पडली आहेत. याचं काय? असा सवाल त्यांनी केला.