चिपळूणमधील कार्यक्रमात आपल्या भाषणादरम्यान अखेरच्या टप्प्यात नारायण राणेंना भोवळ आली होती, त्यांचा आवाजही बसल्याने त्यांनी भाषण आटोपतं घेतलं. चक्कर आल्यासारखे वाटत असल्याने माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. तर, या कार्यक्रमाच्या ठिकाणाहून नारायण राणे थेट गेस्ट हाऊसकडे रवाना झाले. मात्र, आता त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत सर्वच प्रश्नांची उत्तरे दिली. आता माझी तब्येत ठीक असल्याचंही त्यांनी सांगितलं. भाषणात बोलताना माझं ब्लड प्रेशर लो झालं होतं आणि डायबेटिस शुगर सव्वातीनशेच्या वर गेली होती. त्यामुळे, मला अस्वस्थपणा आणि चक्कर आली होती. मात्र, आता मी ठीक आहे, असेही राणेंनी सांगितले. खा. राणे यांची चिपळुणातील कार्यक्रमात बिघडल्याचे वृत्त विविध माध्यमांवर झळकताच कोकणच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. मात्र खुद्द खा. राणे यांनी आपण ठणठणीत बरा असल्याचे सांगत राजकारणातही कार्यरत रहाणार असल्याचे संकेत दिले.
भाजप नेते तथा खासदार नारायण राणे यांनी रविवारीच आपल्या भाषणात राजकीय संन्यास घेण्याचे, राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले होते. आता, वय झालंय, थांबायला हवं असे त्यांनी म्हटलं होतं. राजकीय निवृत्तीचे संकेत दिल्यानंतर चिपळूणमधील कृषी महोत्सवाच्या कार्यकमावेळी माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांना भोवळ आल्याने सर्वांची धावपळ उडाल्याचं पाहायला मिळालं. आता, नारायण राणेंनी तब्येतीलबद्दल माहिती देत मी ठीक आहे, असे म्हटले आहे. तसेच, राजकीय निवृत्तीचे संकेत कोणी दिले? मी तसं बोललो नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. निवृत्तीचे संकेत कोणी दिले? असे. म्हणत नारायण राणेंची यांनी राजकीय निवृत्तीच्या चर्चेवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. माझं वाक्य नीट बघा. जर मी रिझल्ट देऊ शकलो नाही तर म ाझ्या पदाचा उपयोग काय? निवृत्त होतो असं मी म्हटलेलं नाही, असे नारायण राणेंनी स्पष्ट केले.
जर माझ्या पदाचा उपयोग जनमानसाला होत नसेल आणि होऊ देत नसतील तर पूर्णविराम देईल, असे मी म्हटल्याचं राणेंनी सांगितलं. त्यामुळे, राजकीय निवृत्तीच्या चर्चांना राणेंकडून पूर्णविराम देण्यात आला असून राजकीय निवृत्ती घेणार नसल्याचेच त्यांनी सूचवलं आहे. सिंधुदुर्गातल्या सभेत बोलताना नारायण राणे म्हणाले की, आजही नारायण राणे रस्त्यावर भाजी घेतो. हातात अंगठ्या घालून, काळ्या काचेच्या गाड्या घेऊन काही जण येतात. पण माझ्या गाडीला काळ्या काचा नाहीत. माणुसकी हा माझा धर्म आहे. बऱ्याच जणांनी माझ्या आड येण्याचं काम केलं, त्यावर मी आज बोलणार नाही. तेव्हाही मला अडचणी आल्या, आतांही आल्या. राजकारणात कट कारस्थान केलं जातंय. त्यामुळे, आता मी ठरवलंय, घरी बसायचं. मुलांना सांगेन नांदा सौख्य भरे…. चांगल्याला जोपासा., असे राणेंनी म्हटले होते. मात्र, आता या वाक्याचा अर्थ समजावून सांगत त्यांनी निवृत्तीच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

