सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यासाठी विदर्भातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पांमधून तारा आणि चंदा या दोन वाघिणी सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात स्थलांतरित करण्यात आल्या आहेत. त्यांनी पिल्ले दिली तर उर्वरित वाघांचे स्थलांतर करण्याची गरज पडणार आहे. सह्याद्रीत दाखल झालेल्या वाघिणींचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांना घाबरण्याचे काही कारण नाही. सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात पूर्वी तीन वाघ होते. यातील एक वाघ कोयनेच्या जंगलात तर दोन चांदोलीच्या जंगलात आहेत. कोयना आणि चांदोली अभयारण्य मिळवून सह्याद्री व्याघ्रप्रकल्प झाल्यानंतर येथे वाघांची प्रजनन संख्या वाढवण्यासाठी ताडोबा अंधारी आणि पेंच व्याघ्रप्रकल्पमधून ८ वाघ आणण्याची परवानगी शासनाने दिली आहे.
पहिल्या टप्प्यात दोन वाघिणींचे स्थलांतर यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. यातील एक वाघीण कुंभार्ली घाट आणि पाटणच्या परिसरात आल्याची अफवा पसरली होती. या पार्श्वभूमीवर सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाचे उपसंचालक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सह्याद्री व्याघ्रप्रकल्पातील वाघांच्या हालचालींवर प्रशासनाची बारकाईने नजर आहे. रेडिओ कॉलरच्या माध्यमातून त्यांच्या हालचाली टिपल्या जात आहेत. ते लोकवस्तीच्या जवळपासही आलेले नाही. व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र मोठे आहे. त्यांनी इतक्या लवकर वाघ लोकवस्तीजवळ येण्याची शक्यता नाही. नव्याने दाखल झालेल्या वाघांचे लोकेशन प्रत्येक अर्ध्या तासानंतर आम्हाला कळते. जुन्या वाघांचे लोकेशन कॅमेरा ट्रॅपिंगमधून समजते.
… तर आणखी वाघीण आणण्याची गरज नाही – नव्याने दाखल झालेल्या वाघिणी शिकार करत आहेत. सह्याद्री व्याघ्रप्रकल्पातील वातावरणात दोन्ही वाघिणी रमल्याचे दिसत आहेत. सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात तीन नर आणि दोन मादी वाघ आहेत. त्यांचे मिलन झाल्यानंतर पुढील दीड वर्षात सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघांचे बछडे जन्म घेतील. नियोजनाप्रमाणे हे शक्य झाले तर सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघांची संख्या वाढेल आणि शासनाचे उद्दिष्ट साध्य होईल. त्यानंतर ताडोबा आणि पेंच प्रकल्पातून वाघीण आणण्याची गरजही भासणार नाही. दोन वाघिणी आणल्यानंतर ही मोहीम सध्या थांबवण्यात आली आहे. उर्वरित सहा वाघिणी आणायचे किंवा नाही हे अजून निश्चित नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

