शेतीचा हंगाम तोंडावर आला असताना अचानक रासायनिक खतांच्या किमती वाढविल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सर्व खतांच्या किमतीमध्ये बरीच तफावत जाणवत असल्याने शेतकऱ्यांपुढे रासायनिक खताची खरेदी करायची कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि एवढ्या वाढीव दराने खत घेणे खिशाला परवडणारे नसल्याने शेतकरी बागायतदार संघटनांकडून तक्रार नोंदविण्यात आली आहे. रासायनिक खतांसाठी शासन अनुदान देत असले तरी सुद्धा विक्री मात्र चढ किमतीनेच होताना दिसत आहे.
वर्षभर शेतीमध्ये काबाड कष्ट करून आपल्या दोन वेळच्या जेवणाची सोय बळीराजा करत असतो. त्यातूनही वादळ, अति वारा, पाऊस यासारख्या नैसर्गिक संकटांचा सुद्धा सामना करावा लागत असल्याने बळीराजा हालाखीच्या परिस्थितीमध्ये जगत आहे. आणि त्यामध्ये शेतीच्या हंगामापूर्वीच खतांच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढविल्याने खत खरेदी कशी करायची असा यक्षप्रश्न आ वासून राहिला आहे.
रासायनिक खताच्या खरेदीसाठी ग्रामीण भागातून रत्नागिरी शहरामध्ये यावे लागते, त्यासाठी येणारा खर्च तसेच खताची ने-आण करण्यासाठी होणारा वाहनाचा खर्च,सद्य स्थितीला कोरोनामुळे शेतकर्यांना बांधावर बियाणे, खते यांचा पुरवठा केला जात असला तरी, हमाली पासून ते वाहतुकीपर्यंतचा खर्च शेतकऱ्यालाच सोसावा लागत आहे. त्यात हे खतांचे वाढीव दर. विक्रेत्यांकडे चौकशी केली असता, शासनाने अद्याप अनुदानाबद्दल कोणतीही भूमिका स्पष्ट मांडली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या वाढीव दरामध्येच शेतकर्यांना खते खरेदी करावी लागत आहेत.
कोरोनामुळे आणि तौक्ते वादळामुळे आधीच विविध प्रकारच्या नुकसानीतून बळीराजा उठू पाहत आहे परंतु, महागाई आणि या रासायनिक खताच्या भरमसाठ किमतीने त्याचे कंबरडे मोडले आहे.