रत्नागिरी: आगामी गणेशोत्सवाचे वेध आता अवघ्या महाराष्ट्राला लागले असून, मुंबई-पुण्यासह विविध शहरांमधून लाखो कोकणवासीय (चाकरमानी) आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी गावी जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रवासातील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्डे प्रवाशांच्या चिंतेत भर घालत आहेत. याच पार्श्वभूमीवर चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि विनाअडथळा व्हावा, यासाठी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कुंभार्ली व अणुस्कुरा घाटासह कोकणातील ६ प्रमुख घाट रस्ते तातडीने दुरुस्त करून खड्डेमुक्त करण्याची जोरदार मागणी केली आहे.
कुंभार्ली घाटाची बिकट अवस्था; डॉ. विनय नातू यांनी वेधले लक्ष
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणजे गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुंभार्ली घाट. मुसळधार पावसातही अखंडपणे सुरू राहणारा हा घाट चिपळूण, गुहागर आणि लगतच्या परिसरातील वाहतुकीची मुख्य जीवनवाहिनी मानला जातो. मात्र, सध्या संततधार पावसामुळे या घाटाची मोठी दुरवस्था झाली असून जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना आणि वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
या गंभीर समस्येकडे गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी एका निवेदनाद्वारे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले होते. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांचे हाल लक्षात घेऊन रवींद्र चव्हाण यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालत थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू केला आहे.
केवळ मुंबई-गोवा महामार्गच नव्हे, पर्यायी घाटही तितकेच महत्त्वाचे!
दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड ताण येतो. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शासन अवजड वाहनांवर बंदी घालणे, माणगाव, इंदापूर व कोलाड पट्ट्यात विशेष उपाययोजना करणे असे पावले उचलते. मात्र, सद्यस्थितीत अनेक प्रवासी आणि मालवाहतूकदार महामार्गावरील कोंडी टाळण्यासाठी पर्यायी घाटमार्गांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात.
त्यामुळे केवळ मुंबई-गोवा महामार्गापुरती मजल न मारता, कोकणाला पश्चिम महाराष्ट्र व देशांतर्गत भागांशी जोडणारे पर्यायी घाट रस्तेही दर्जेदार आणि खड्डेमुक्त असणे तितकेच गरजेचे आहे, यावर या पत्रात भर देण्यात आला आहे.
या ६ प्रमुख घाटांच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी:
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील वाहतुकीच्या दृष्टीने कणा मानल्या जाणाऱ्या खालील ६ प्रमुख घाटांच्या कामांचा एकत्रित तातडीचा आढावा घेण्याचे आवाहन केले आहे:
-
रायगड जिल्ह्यातील घाटमार्ग:
-
ताम्हणी घाट (पुणे-कोकण जोडणारा महत्त्वाचा मार्ग)
-
वरंधा घाट (भोर-महाड जोडणारा नैसर्गिक घाट)
-
महाबळेश्वर घाट (पोलादपूर-महाबळेश्वर पट्टा)
-
-
रत्नागिरी जिल्ह्यातील घाटमार्ग: 4. कुंभारली घाट (चिपळूण-कराड मुख्य दुवा) 5. आंबा घाट (रत्नागिरी-कोल्हापूर जोडणारा व्यस्त मार्ग) 6. अणुस्कुरा घाट (राजापूर-कोल्हापूर दरम्यानचा जलद पर्यायी मार्ग)
चाकरमान्यांचा सण निर्विघ्न पार पडो!
गणेशोत्सव हा अवघ्या कोकणासाठी वर्षातला सर्वात मोठा आणि जिव्हाळ्याचा सण असतो. तासनतास प्रवासाचा शीण आणि खड्ड्यांमुळे होणारी पाठदुखी, वाहनांचे नुकसान यामुळे चाकरमान्यांचा उत्सवाचा आनंद हिरावला जाऊ नये. म्हणूनच गणेशोत्सवापूर्वी युद्धपातळीवर डागडुजी करून हे सर्व घाटमार्ग सुरक्षित व वेगवान प्रवासासाठी सज्ज करावेत, असा सूर या मागणीतून व्यक्त करण्यात आला आहे. आता राज्य सरकार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यावर किती वेगाने पावले उचलतो, याकडे अवघ्या कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.

