जगात कोरोनाचे संकट पुन्हा डोके वर काढू लागल्याने, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय समोर उपलब्ध असल्याने, शासकीय व प्रशासकीय यंत्रणांनी लसीकरणावर जोर दिला होता. काही दिवसापासून चीनसह काही देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे भारतातील आरोग्य यंत्रणा देखील अलर्ट झाली आहे. कोरोना संसर्गाचा धोका होता तोपर्यंत नागरिकांकडून लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत होता. चिपळूनमधील रामपूर, कापरे, खरवते, सावर्डे, फुरूस, वहाळ, शिरगाव, अडरे आणि चिपळूण शहर येथे लसीकरण केंद्रावर पहाटेपासून रांगा लागत होत्या. परंतु काही महिन्यांपासून कोरोनाचा धोका कमी झाला. शासनाने देखील सर्व निर्बंध उठवले, त्यामुळे नागरिकांना मोकळीक मिळाली आणि लसीकरणाकडे लोकांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले.
लसीकरणासह त्रिसुत्रीचा अवलंब करण्याच्या सूचना केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातून लसीकरणाबाबत माहिती घेतली असता बुस्टर डोसकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. कोरोनाच्या बदलणाऱ्या रुपाचा सामना करण्यासाठी बुस्टर डोस प्रभावी ठरेल असे मानले जात आहे. ज्या नागरिकांनी लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे त्या नागरिकांना बुस्टर डोस दिला जात आहे. पण दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांपैकी १ लाख ५४ हजार ९८५ लोकांनी अद्याप बुस्टर डोस घेतलेला नाही. तर पहिला डोस घेतलेल्यांपैकी १ लाख ८८ हजार ४४७ लोकांनी बुस्टर डोसकडे पाठ फिरवली आहे.
कोरोना संसर्गाच्या नवीन व्हेरिअंटने पुन्हा डोके वर काढल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोना वेशीवर आला असतानाही चिपळूण तालुक्यातील नागरिकांनी प्रिकॉशन डोसकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. तालुक्यातील केवळ २० हजार १८१ लोकांनी बुस्टर डोस घेतला आहे. पहिला डोस घेतलेल्यांपैकी ३३ हजार ४६२ नागरिकांना दुसरा डोस घेतलेला नाही. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी महत्वपू्र्ण असलेल्या लसीकरणाकडे शहरातील नागरिकांनी पाठ फिरवली आहे.