रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत सदस्य होण्यासाठी अनेक इच्छुकांची धडपड दिसून येत आहे. या निवडणुकीवरही विधानसभा निवडणुकीचा परिणाम होणार असून, महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेची निवडणूक जुन्याच प्रभागांमध्ये होणार आणि ओबीसींच्या १६ टक्के आरक्षणानुसारच होणार आहेत. दरम्यान, न्यायालयाच्या या आदेशानंतर ऐन पावसाळ्यात मतदारांना निवडणुकीचे रंग पाहता येणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरी जिल्हा परिषदेवर प्रशासक राज आहे; मात्र या निकालानंतर मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना कारभारी मिळणार आहेत. त्यामुळे गावागावांतील इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह संचारला आहे.
ओबीसी आरक्षणामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. गेल्या साडेतीन वर्षांपासून रत्नागिरी जिल्हा परिषदेवर प्रशासक राज होते; मात्र नुकत्याच झालेल्या सुनावणीनंतर तब्बल साडेतीन वर्षाने या निवडणुका लागणार आहेत. मागील दोन वर्षांपासून इच्छुकांनी आपापला मतदारसंघ पिंजून काढला आहे. मात्र, सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्ताने इच्छुकांचे खिसे रिकामी झाले होते. निवडणकीचे नोटिफिकेशन देणे, निवडणूक कार्यक्रम घेणे ही सर्व तयारी करावी लागणार आहे तसेच, या निवडणुकीचे म्हणून गटनिहाय किंवा तालुकानिहाय आरक्षण जाहीर करावे लागणार आहे. २०२२ मध्ये नव्याने आरक्षणानुसार सोडत जाहीर झाली होती. यावर आक्षेप घेतल्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. त्यामुळे २०२२ ला झालेली आरक्षण सोडत रद्द करत नव्याने आरक्षण सोडत होणार आहे. यापूर्वी ज्या ठिकाणी आरक्षण पडले त्या ठिकाणचे आरक्षण यंदा बदलणार आहे. त्यामुळे ५६ गटांसाठी पुन्हा नव्याने आरक्षण सोडत घेतली जाईल. याबाबत निवडणूक कार्यालयाच्या नियोजनानुसार
या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचा करिष्मा चालला होता. राष्ट्रवादीला दुसऱ्या क्रमांकाची पसंती मिळाली होती. या वेळी दोन्ही पक्षात फूट पडली आहे. दोन्ही पक्षांतील एक गट महाविकास आघाडीबरोबर दुसरा गट महायुतीबरोबर आहे. नुकतेच अजित पवार यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला तेव्हा अनेक स्वराज्यसंस्था स्वबळावर लढण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते माजी खासदार विनायक राऊत, शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जिल्ह्याचा दौरा केला. मनसेनेही चिपळूणमध्ये मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये ही चलबिचल सुरू झाली आहे.