चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी करोडो रुपये खर्च करून वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ उपशाचे काम सुरू आहे; मात्र शिवनदीत काढण्यात येणारा गाळ पुन्हा नदीपात्रातच जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम व शिवसैनिकांनी गुरुवारी (ता. ८) कापसाळ येथील पाटबंधारे विभागावर धडक दिली. त्यांनी गाळ उपशात फसवेगिरी सुरू असून, भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांना खडसावले. संतप्त पदाधिकाऱ्यांनी कामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत नदीकिनारी ठेवलेला गाळ तातडीने नदीपात्राबाहेर काढण्याची मागणी केली. येत्या काही दिवसांत कामात सुधारणा झाली नाही, तर याद राखा, गाठ आमच्याशी आहे, असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
जलसंपदा विभागामार्फत चिपळूण शहर परिसरात वाशिष्ठी व शिवनदीत गाळ उपसा काम सुरू आहे. नाम फाउंडेशननेही आपली यंत्रणा पाठवून काम सुरू केले आहे. पावसाळा अवघा एका महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्यातच शिवनदीतून काढला जाणारा गाळ पुन्हा नदीकिनारी ठेवला जात आहे. त्यावर शिवसेना उबाठा पक्षाने संताप व्यक्त केला आहे. गुरुवारी सकाळी पक्षाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागावर धडक दिली. सूचना देऊनही उपविभागीय अधिकारी विपुल खोत कार्यालयात हजर नसल्याने शिवसैनिक आक्रमक झाले. सहाय्यक अभियंत्यांशी चर्चा करताना चिपळुणात सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या कामावर जोरदार आक्षेप घेत या कामात हलगर्जीपणा झालेला खपवून घेतला जाणार नाही, हे स्पष्ट केले. गाळ उपशावरून बाळा कदम म्हणाले, आमच्या घरादारात नाकातोंडात पाणी जातेय. त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला १० कोटींचा निधी दिला.
पालकमंत्री उदय सामंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नारायण राणे, माजी खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, भास्कर जाधव आदी लोकप्रतिनिधी गाळ उपशाच्या कामाला गती येण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. तुम्ही मात्र गाळ काढण्याच्या नावावर शासनाच्या पैशाची उधळपट्टी करताय. हा पैसा जनतेचा आहे, तुम्हाला खाण्यासाठी दिलेला नाही, हे लक्षात ठेवा. गाळ काढण्याचे काम कसे सुरू आहे, कोणाच्या जमिनींमध्ये गाळ टाकला जातोय, याची सर्व जंत्री आमच्याकडे आहे. तोंड उघडायला लावू नका. आता आम्ही शांतपणे बोलतोय, पुढे ऐकणार नाही. तुमच्या या सर्व भ्रष्टाचाराचा भांडाफोड केल्याशिवाय राहणार नाही. या वेळी उपशहरप्रमुख भैय्या कदम, सचिव प्रशांत मुळ्ये, युवासेना शहराधिकारी पार्थ जागुष्टे, संतोष पवार, संजय रेडीज, राहुल गुरव, रियान मालदार, संजय गोताड, मनोज पांचाळ, संदेश किंजळकर, आकाश कदम, मयूर फटकुरे, नीतेश चिपळूणकर, सचिन चोरगे, चेतन कदम आदी उपस्थित होते.
नदीकाठचा गाळ काढणार – शिवनदीतील गाळाची वाहतूक करण्यासाठी तिथे डंपर जाण्यास अनेक ठिकाणी अडचणी आहेत. त्यामुळे काढलेला गाळ मागे आणून डंपर जाईल तिथेच गाळ ठेवण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या. नदीकाठी जिथे गाळ ठेवला आहे तो काढण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांनी स्पष्ट केले.