उद्योगमंत्री उदय सामंत आहेत. देशात, महाराष्ट्रात उद्योग आणण्याचे काम ते करतात; पण केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणे रत्नागिरीचा विकास मीच करणार. तीन वर्षांत येथे मीच उद्योग आणणार. त्यामुळे उदय सामंतांना विनंती करायची आहे, तुमचे येथील दुकान बंद करण्याचे काम राणेंनी सुरू केले आहे, असा टोला खासदार विनायक राऊत यांनी लगावला. महाविकास आघाडीच्या नाचणे येथील मेळाव्यात राऊत म्हणाले, “आजपर्यंत आम्ही कधीही सामंत कुटुंबीयांचा अवमान केलेला नाही. कधीही अपमानकारक शब्दही मी काढलेले नाहीत. आदरणीय आण्णा सामंत, किरण ऊर्फ भैया सामंत असोत वा उद्योगमंत्री उदय सामंत असतील आम्ही नेहमीच त्यांच्याशी आदराने बोलतो.
आमच्यात राजकीय वैर तर आहेच; पण एक आदर, माणुसकी, कोकणातील संस्कार याची आठवण तरी राणेंना झाली पाहिजे होती.” आजपर्यंत किरण सामंतांना, कोण हा किरण सामंत, असं कुणी कधीतरी विचारलं का, असा सवाल राऊत यांनी या मेळाव्यात उपस्थितांसमोर केला; पण केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मागील पत्रकार परिषदेत कोण तो किरण सामंत, असे जेव्हा अवमानकारक शब्द उच्चारले त्याच वेळेस नारायण राणेसाहेब तुमचं जहाज बुडालं म्हणजे बुडालं असं सांगत सूचक इशाराच राऊत यांनी दिला आहे. सामंत कुटुंबीयांनी स्वतःविषयी आदर निर्माण केला होता. आमचे राजकीय वैर असले तरी त्यांच्याकडे आम्ही आदराने पाहतो, असे विनायक राऊत म्हणाले.