रत्नागिरी जिल्ह्यातील काजू व्यवसाय कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अडचणीत सापडत आहे. जिल्ह्यात सव्वा तीनशेहून अधिक काजू प्रक्रिया उद्योजकांवर बँकांकडून कारवाईची टांगती तलवार आहे. चाळीस कोटींच्या कर्जांचे पुनर्गंठन करावे; अन्यथा प्रक्रिया उद्योजक अडचणीत येईल, अशी मागणी काजू प्रकिया व्यावसायिकांनी माजी खासदार, भाजपचे नेते निलेश राणे यांच्याकडे केली आहे. त्यांनीही व्यावसायिकांच्या अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.
रत्नागिरी एमआयडीसी येथील काजू प्रक्रिया उद्योजक संदेश दळवी यांच्या दळवी कॅशू प्रकल्पाला गुरुवारी ता. २९ भाजप नेते निलेश राणेंनी भेट दिली. यावेळी दळवी यांच्यासह काजू प्रक्रिया संघटनेचे विवेक बारगिर, ऋषिकेश परांजपे, प्रताप पवार, संदेश पेडणेकर, दिनेश पवार, तौफिक खतीब आदी उपस्थित होते.
राणे यांनी संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करताना त्यातील वेगवेगळ्या युनिट्सची सविस्तर माहिती घेतली. त्यांना येणाऱ्या समस्याही जाणून घेतल्या. दळवी यांनी सांगितले की, काजू प्रक्रिया उद्योग कष्टाने मोठा केला आहे. निव्वळ वीस हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरू केलेल्या या युनिटची उलाढाल आज कोटीच्या घरात पोहोचली आहे. परंतु, मागील दोन वर्ष सर्व जगावर घोंघावणारे कोरोनाचे संकट त्यामुळे सर्व उलाढाल थांबल्यामुळे काजू उद्योजक अडचणीत आले आहेत. त्यासाठी शासनाने काहीतरी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याची मागणी काजू प्रक्रिया उद्योजकांनी राणेंकडे केली आहे.
काजू प्रक्रिया व्यवसायिकांना येणाऱ्या अडचणी नीलेश राणे यांनी जाणून घेतल्या. थकीत कर्जामुळे उद्योजकांना नव्याने कर्ज देण्यास बँका तयार नाहीत. थकीत हप्ते वसूल करण्यासाठी बँकांकडून व्यावसायिकांकडे तगादा लावण्यास सुरुवात झाली असून, मालमत्तेवर टाच आणण्यासाठी नोटीसा येऊ लागल्या आहेत. कोरोनातील परिस्थितीमुळे कोकणातील काजू उद्योगाची जर अशीच परिस्थिती राहिली तर, हजारो लोकांचा रोजगार बुडणार आहे; त्यामुळे शासनाने त्यांना उभारण्यासाठी वेळीच साथ दिली पाहिजे.