मराठी शाळा वाचवा अशा प्रकारच्या अनेक घोषणा केवळ हवेतच विरून गेल्या आहेत. जि.प. शाळांनी शिक्षणाचा कितीही दर्जा राखला तरी, त्यांची पटसंख्या दिवसेंदिवस घटतच चालली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांचा पट देखील दिवसेंदिवस कमी होत चालल्याने, स्थिती चिंताजनक बनत चालली आहे.
गेल्या काही वर्षात पट कमी होण्याची गती अधिकच वेगाने वाढत आहे. जिल्हा परिषदेच्या १ हजार ३४५ प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये ० ते ५ पटाच्या २४९ शाळांचा समावेश आहे. गुणवत्ता वाढीसाठी कमी पटच्या शाळा बंद करून त्यातील विद्यार्थी जवळच्या शाळेमध्ये समायोजित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, मात्र रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता याचा फटका विद्यार्थ्यांना बसू शकतो. शाळांमधील अंतर मोठे असल्याने विद्यार्थ्यांना बरंच अंतर पायपीट करावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शासनाकडून प्रत्येक वर्षी शिक्षकांना आदेश काढून उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये पट वाढण्यासाठी आणि कोणतही मुल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी, विभाग ठरवून देऊन त्यामध्ये जाऊन सर्व्हे करून त्याचा अहवाल शासन दरबारी सादर करण्यास सांगितले जाते. शिक्षक देखील उन्हातान्हातून फिरून माहिती गोळा करून पट वाढीसाठी प्रयत्न करत असतात.
विद्यार्थी संख्या, मंजूर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, शून्य ते वीस विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांची संख्या, बंद केलेल्या शाळांची आकडेवारी संकलित केली जात आहे. कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही शासनाकडून काही शाळांमधील विद्यार्थी जवळच्या शाळेत समायोजित केले गेले होते.
जिल्ह्यातील २८ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. सध्या जिल्हा परिषदेच्या १ ते ८ वीच्या २ हजार ४४६ शाळांमध्ये ७२ हजाराहून अधिक विद्यार्थी आहेत. गुणवत्ता असली तरीही अनेक शाळांचा पटही कमी होत आहे.