नवरात्रोत्सवानिमित्त शहरात बऱ्याच प्रमाणात रेलचेल दिसून येत आहे. अनेक ठिकाणी परजिल्ह्यातून झेंडूची फुले विक्रीसाठी आलेले व्यापारी बसलेले दिसून येत आहेत. शहरात जयस्तंभ पासून सुरुवात झाली असून ते थेट बसस्थानकापर्यंत रस्त्याच्या बाजूला हे विक्रेते विक्रीसाठी बसले आहेत. परंतु, त्यांनी विक्रीसाठी मांडलेले स्टॉल रस्त्यात येत असून त्यामुळे काही प्रमाणात वाहतूकीला अडथला निर्माण होत आहे. अनेक वेळा कोणत्याही वेळी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे.
पालिकेने देखील सणा सुदीचे दिवस असल्याने या अतिक्रमणविरोधी पथकाने टोकाची भूमिका न घेता स्टॉल धारकांना पहिल्या दिवशी समज दिली तसेच वाहतुकीला अडथळा आल्यास कारवाई करू, असा इशारा देखील दिला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परजिल्ह्यातून आलेले अनेक झेंडुची फुले विकणारे व्यापारी बसले होते. त्यांनाही समज देण्यात आली. आणि त्या विक्रेत्यांना अन्यत्र स्टॉल लावण्यास पालिकेने सांगितले, त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बरेचशे स्टॉल कमी झाले होते.
नवरात्र आणि दसरा सणासाठी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात झेंडुची फुले विक्रीसाठी दरवर्षी येतात. सोबतच या कालावधीमध्ये व्रत वैकल्ये उपवास असल्याने अनेक फळ विक्रेत्यांनी देखील मुख्य मार्गावर अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे देखील वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. मात्र पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने काल या स्टॉलधारकांना समज देत रस्त्यातून मागे केले तसेच सणासुदीचे दिवस असल्याने त्यांना सवलत दिली असली तरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील स्टॉलधारकांनी स्टॉल काढावे, अशा सूचना पथकाने दिल्या. अनेकांचे नवरात्र असल्याने फळविक्रेत्यांनाही चांगलाच दर आला होता. शिस्त लावण्याच्या दृष्टीने पालिकेची पथक सतत कार्यरत आहेत. पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे नेतृत्व पाटील यांच्याकडे होते.