रत्नागिरी जिल्ह्यातील कोविडच्या संक्रमणामुळे ज्यांचे पालक मृत्यू पावले आहेत अशा अनाथ झालेल्या मुलांचे संगोपन आणि काळजी घेण्यासाठी रत्नागिरीतील ३ संस्थांकडे त्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अचानक कुटुंबातील भक्कम आधार निघून गेल्याने ही मुल भांबावलेल्या स्थितीमध्ये आहेत. त्यांना मानसिक आणि शारिरीक पाठबळ देण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रायांनी जिल्हास्तरीय कृती दलाची स्थापना केली आहे. कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या ० ते १८ वयोगटातील पाल्यांना आवश्यक ती सर्वतोपरी मदत तसेच त्यांना कायदेशीर हक्क मिळण्यासाठी तसेच त्यांचे चांगल्या तर्हेने पाळणूक होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी या संदर्भीय जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आज आयोजित करण्यात आली होती.
त्या बैठकीमध्ये काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. कोविड आजारामध्ये दोन्ही पालक दगावल्याने अनाथ झालेल्या ० ते १८ वयोगटातील मुलांचे पालनपोषण तसेच संरक्षण करण्यासाठी जिल्ह्यातील लांज्यामधील कै.जानकीबाई आक्का तेंडूलकर महिलाश्रम संचलित मुलींचे निरीक्षणगृह-बालगृह, तसेच कै. ना.प. अभ्यंकर निरीक्षणगृह-बालगृह तर ० ते ६ वयोगटातील मुलांसाठी भारतीय समाज सेवा केंद्र-शिशुगृह चिपळूण या तीन संस्थांची निवास करण्यात आली आहे.
जिल्हाधिकार्यांनी स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय कृती दलाचे अध्यक्षपद स्वत: त्यांच्याकडे असणार आहे. तसेच या अनाथ झालेल्या मुलांना कायमस्वरूपी मदतीसाठी म्हणून चाईल्ड हेल्पलाईन नं.१०९८, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ९२२५८९२३२५, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय ०२३५२-२२०४६१, बालकल्याण समिती ९८२२९८३६२०, सेव्ह द चिल्ड्रन्स हेल्पलाईन ७४५३०१५५१८ यापैकी कोणत्याही क्रमांकावर संपर्क करून मदत मागण्याचे आवाहन केले आहे.