कोकणातील सर्वांत मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव नोकरी, व्यवसायानिमित्त जिल्ह्याबाहेर वास्तव्यास असलेले चाकरमानी या गणेशोत्सवासाठी आवर्जून गावी येतात. त्यासाठी मुंबईतून जिल्ह्यात जादा गाड्या सोडण्यात येतात. त्याप्रमाणे गणेशोत्सवासाठी आलेल्या मुंबईकरांना परतीच्या प्रवासासाठी जादा गाड्यांचे नियोजन केले जाते. रत्नागिरी एसटी विभागाने जादा गाड्यांचे नियोजन केले असून, आतापर्यंत १ हजार २०० गाड्यांचे आरक्षण प्रवाशांनी केले आहे. महिलांसाठीच्या योजनेमुळेही यावर्षी प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे.
प्रवाशांच्या मागणीनुसार जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना घरबसल्या आरक्षण करता यावे, यासाठी ऑनलाईन आरक्षण सुविधा उपलब्ध केली आहे, शिवाय ६० दिवस आधी आरक्षण उपलब्ध केल्याने प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सात सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. जिल्ह्यात २ सप्टेंबरपासून मुंबई व उपनगरांतून जादा गाड्यांचे आगमन होणार आहे. गतवर्षी मुंबईतून १४०० गाड्या आल्या होत्या. यावर्षीही गतवर्षीइतक्याच गाड्या अपेक्षित आहेत. १२ सप्टेंबरला गौरी गणपती विसर्जन आहे.
गौरी-गणपती विसर्जन झाल्यानंतर त्या दिवसापासूनच मुंबईकर परतीच्या प्रवासाला लागतात. त्यामुळे १२ सप्टेंबरपासून परतीच्या जादा गाड्यांचे नियोजन रत्नागिरी एसटी विभागाने केले आहे. गतवर्षी २ हजार २०० जादा गाड्या मुंबई मार्गावर सोडण्यात आल्या होत्या. यावर्षी आतापर्यंत १२०० जादा गाड्यांसाठी आरक्षण करण्यात आले आहे. गतवर्षीइतक्या गाड्या यावर्षीही परतीसाठी आरक्षित होतील, असे सांगण्यात येत आहे. आरक्षणासाठी npublic. msrtcors.com अधिकृत संकेतस्थळावर आरक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे.