रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती लक्षात घेता, कोरोना चाचणी वाढविण्याकडे लक्ष केंद्रित करण्याचे सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या आहेत. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात एकच कोरोना चाचणी प्रयोगशाळा आहे. त्याची क्षमताही दीड ते दोन हजार असून, २४ तास ती मशीन सुरु असते.
जिल्ह्यामध्ये रुग्णालयामध्ये सध्याच्या घडीला दिवसाला दोन ते अडीच हजार चाचण्या होतात, परंतु, मधल्या काळामध्ये साडेतीन ते चार हजार नमुन्यांचा अहवाल प्रलंबित होता. मशीनवर जास्त प्रमाणात लोड असल्याने अहवाल मिळायला विलंब लागत होता. परंतु, आत्ता त्यामध्ये अहवाल २-३ दिवसामध्ये मिळणे शक्य झाले आहे. पण तपासणीसाठी येणारा रुग्ण अहवाल मिळेपर्यंत अनेक ठिकाणी वावरून आलेला असल्याने कोरोना स्प्रेडरचे काम असे रुग्ण करतात. त्यामुळे कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी चाचण्यांचे अहवाल वेळेवर मिळणे गरजेचे असून, त्यासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये दुसरी प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा चिकित्सक डॉ.संघमित्रा फुले यांनी दिली आहे.
जिल्हा रुग्णालयामध्ये सध्या एकच कोरोना प्रयोगशाळा असल्याने दिवसाला दोन ते अडीच हजार चाचण्या शक्य आहेत, अजून एक प्रयोगशाळा सुरु झाली तर तेवढ्याच चाचण्यांमध्ये वाढ होऊन, चाचण्याची संख्या पाच हजारांपर्यंत वाढू शकल्याने, अहवाला वेळेत मिळाला तर संसर्गाचा प्रतिबंध करणे शक्य होणार आहे. जिल्हा रेड झोन मध्ये गेल्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्ह्यातील संबंधित पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेऊन चाचण्या आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यावर भार देण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्ह्यात अजून एक चाचणी प्रयोगशाळा व्हावी, म्हणून नाम.उदय सामंत आग्रही होते, मुख्यमंत्र्यांशी याबाबतीत चर्चा सुद्धा केली गेली. प्रत्यक्षात येत्या चार दिवसामध्ये दुसरी प्रयोगशाळा प्रत्यक्षात उभी राहणार आहे.