खुर्ची आणि पद असल्यावर अनेक व्यक्ती हवेत असल्यारखे वागत असतात. मी म्हणेन तीच पूर्वदिशा, अशा विचारसरणीच्या लोकांची अनेक उदाहरणे सध्या समोर येत आहेत. जरी अधिकारी म्हणून खुर्चीवर बसलेले असले तरी समोरच्या व्यक्तीशी असणारी वागणूक आपली कशी आहे त्यावरून ज्याची त्याची किंमत ठरते. अशाच काही घटना रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदमध्ये घडल्याच्या कानावर आल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी सभेमध्ये संबंधितांची चांगलीच कानउघडणी केली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी शामराव पेजे सभागृहात झाली. त्या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने यांच्यासह सर्व सभापती आणि सदस्य उपस्थित होते. कोरोनामुळे गती मंदावलेला कारभाराला पुन्हा वेग येण्यासाठी प्रत्येक तालुक्याला जाऊन पाचसूत्री कार्यक्रम राबवण्याचा निर्णय अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी जाहीर केला आहे. या पाचसूत्री कार्यक्रमामध्ये झीरो पेंडसी, जलजीवन मिशनला चालना देणे, मनरेगा योजनेवर भर, कोरोनातील परिस्थितीचा आढावा आणि थांबलेल्या विकास कामे मार्गी लावण्यासाठी तेथील सदस्यांसह अधिकाऱ्यांसह आढावा बैठका घेणार असल्याचे विक्रांत जाधव यांनी सर्वसाधारण सभेत सांगितले.
त्यासोबतच दापोली तालुक्यातील शाखा अभियंता श्री. खाचे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी चारूता कामतेकर यांनी केली असून, यावर चर्चा केल्यानंतर सदर अभियंत्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे आश्वासन अध्यक्षांनी दिले आहे. संगमेश्वर तालुक्यातील शाखा अभियंता श्री. घुगे यांच्या विरोधात सुद्धा संतोष थेराडे व सभापती जया माने यांनी तक्रार केली आहे. त्यावर अध्यक्षांनी संबंधित अधिकाऱ्याला समज देण्यात येईल अशी सुचना दिली. त्या बरोबर प्रत्येक अधिकार्याला संबोधून त्यांनी सूचना दिल्या आहेत. जिल्हा परिषदेमधील सर्व अधिकाऱ्यानी सदस्याशी सौजन्यपूर्ण वागणे अपेक्षित आहे. तसेच विकासकामे करताना त्यांना विश्वासात घेऊनच, सोबत घेतले पाहिजे. दापोली आणि संगमेश्वरमधील शाखा अभियंत्या विरोधातील तक्रारीतून पदाचा सुरु असलेला मनमानीपणा पुढे येतो आहे. तसे निदर्शनास आल्यास संबंधीत अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी सर्वसाधारण सभेत दिला.