देशाच्या बहुतांश भागात यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरणार आहे. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक राज्यांमध्ये मार्च महिन्यापासूनच तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उन्हाळ्यात ‘एल-निनो’ स्थिती तटस्थ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील (मार्च ते मे) तापमानाचा अंदाज हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. डी. एस. पै यांनी शुक्रवारी (ता. २८) जाहीर केला. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात उन्हाळ्याच्या झळा वाढल्या. यातच देशाचे किमान तापमान देखील सरासरीपेक्षा अधिक होते. १९०१ पासूनच्या नोंदीनुसार सरासरीपेक्षा अधिक किमान तापमानात यंदाचा फेब्रुवारी महिना प्रथम क्रमांकावर आहे. फेब्रुवारी महिन्यात देशात १५.०२ अंश सेल्सिअस सरासरी किमान तापमानाची नोंद झाली. यापूर्वी २०१६ मध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक १४.९१ अंश सेल्सिअस सरासरी किमान तापमानाची नोंद झाली होती.
यातच फेब्रुवारी महिन्याचे सरासरी कमाल तापमान (२९.०७) देखील दुसऱ्या सर्वोच्च पातळीवर होते. यापूर्वी २०२३ च्या फेब्रुवारी महिन्यात उच्चांकी २९.४४ अंश सरासरी कमाल तापमानाची नोंद झाली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात (मार्च ते मे) देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता अधिक आहे. या कालावधीत किमान तापमान देखील सरासरीच्या वर राहण्याची शक्यता अधिक आहे. मार्च महिन्यापासूनच तीव्र उष्ण लाटा येण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, हरियाना, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगण, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या उत्तर भागांत उष्णतेचा तीव्र लाटा येण्याची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.