अत्यावश्यक सेवा म्हणजे नक्की काय ! असा प्रश्न पडला तर नवल वाटू नये. सर्वत्र असणारे कोरोनाचे वादळ त्यामुळे काही ठिकाणी माणुसकीला काळिमा फासणाऱ्या माणसांचा सुद्धा अनुभव येतो. कोविडच्या काळामध्ये लॉकडाऊन लागल्यामुळे, इतर सर्व सेवा ठप्प झालेल्या असल्या तरी शासनाने अत्यावश्यक सेवा सुरु ठेवल्या आहेत. अत्यावश्यक सेवेमध्ये अनेक जण येतात जसे किराणा मालाची दुकाने, मेडिकल, दुध,फळ-भाज्या, काही खाजगी वाहन सेवा, वैद्यकीय सेवेपैकी अॅम्ब्युलन्स इ. कोरोना काळामध्ये अनेक माणसांची अनेक रूपे पाहायला मिळतात. तसाच काहीसा अनुभव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका कुटुंबाला आला आहे.
कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये सुद्धा काही ठिकाणी अॅम्ब्युलन्स मालक आणि चालक दुप्पट तिप्पट भाडे आकारताना दिसत आहेत. देवगड मधील अमोल बांदिवडेकर या तरुणाला कोरोनाची लागण झाली असता, त्याला तहसिल कार्यालयाच्या शेजारी असणाऱ्या कोविड रुग्णालयात दाखल केले गेले. परंतु, त्याच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याने आणि श्वसनाचा त्रास जणवत असल्याने डॉक्टरांनी देवगड रुग्णालयामधून अन्य ठिकाणी उपचारासाठी हलविण्यास सांगितले. म्हणून नातेवाईकांनी मुंबईला शिफ्ट करण्यासाठी अम्बुलंसासाठी ओरोस येथील विशाल जाधव यांना संपर्क केला असता, त्यांनी भाडे तीस हजार होईल असे सांगितले. रुग्णाचा जीव वाचविणे महत्वाचे असल्याने ही सर्व मंडळी तयार झाली. रात्री ८ वाजता अॅम्ब्युलन्स देवगड रुग्णालयामध्ये पाठविण्यात आली परंतु, अॅम्ब्युलन्समधील असलेली सुविधा पाहता, त्या परिपूर्ण नसल्याने नातेवाईकांनी मालकाला संपर्क करून अॅम्ब्युलन्स परत पाठवली. कारण अशा अॅम्ब्युलन्समध्ये एवढा लांबचा प्रवास करून रुग्णाला पाठविणे धोक्याचे ठरले असते, म्हणून तशी कल्पना अॅम्ब्युलन्स मालकाला दिली.
परंतु, अॅम्ब्युलन्स परत पाठवल्यावर मालकाने भाडयाच्या पैशासाठी फोन केला आणि दादागिरीची भाषा वापरायला लागला. आणि माझे पैसे दिले नाहीत तर तुमच्या रुग्णाचा इथेच तडफडून मृत्यू होईल, तुम्हाला मुंबईला जायला एकही अॅम्ब्युलन्स मिळणार नाही अशी मी व्यवस्था करून ठेवली आहे. तसेच रुग्णाच्या नातेवाईक महिलेशी सुद्धा खालच्या थराच्या भाषेत बोलत अधिकचे भाडे मागत पैसे देण्याचा बंदोबस्त त्वरित करावा असे सुनावले. अॅम्ब्युलन्स रुग्णासाठी उपयुक्त नसून आणि अधिकचे भाडे देण्यासाठी लावलेला तगादा या प्रकरणामध्ये मनसेने लक्ष घातले असून, त्यांची रितसर तक्रार करून पोलीस अधीक्षक, कलेक्टर आणि आरटीओ ना योग्य ती त्वरित कारवाई करण्याची विनंती केली आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तसेच भाजप आमदार नितेश राणे यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये असणार्या गुन्हेगारावर त्वरित कारवाई करण्याचे म्हटले आहे, नाहीतर असे प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडत राहिल्या तर कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशा बेजबाबदार एका अॅम्ब्युलन्स मालकामुळे विनाकारण इतरांचे देखील नाव मलीन होते.