अयोध्येतील राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा सोहळा शांततेत पार पडल्यानंतर साऱ्या देशात नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केल्यानंतर सोशल मिडियावर हिंदू धर्मियांच्या भावनांना ठेच पोहोचवतील अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. हे लोण वाढतच चालले असून रायगडमधील पनवेलसह रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी, चिपळूण आणि दापोली, खेडमधील घटनांपाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला आणि सावंतवाडीतही अशाचप्रकारे भावना दुखावणाऱ्या पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाल्या. वेंगुर्लामध्ये या पोस्टच्या विरोधात शेकडोंचा जमाव रस्त्यावर उतरला होता आणि दुपारी ३ वाजल्यापासून रात्रौ १ वाजेपर्यंत म्हणजे तब्बल १० तास पोलीस स्थानकाबाहेर आंदोलन सुरु होते.
हिंदू धर्मियांच्या भावनांना ठेच पोहोचेल अशा आशयाच्या आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने वेंगुर्ला आणि सावंतवाडीमध्ये संतापाची एकच लाट उसळली. शेकडोंच्या संख्येने लोकं रस्त्यावर उतरली. वेंगुर्ल्यामध्ये जमावाने काही हातगाड्यांची आणि काही दुकानांची नासधूसही केली. तेढ निर्माण करणाऱ्या संशयित आरोपींना तत्काळ अटक करा अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी सुरु होती. अखेर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतरही जमाव हटत नसल्याने कलम १४४ जारी करत जमावबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर रात्रौ उशिरा हळूहळू जमाव परतला.
जमावाचा निर्धार – जोवर संबंधितांवर कठोर कारवाई होत नाही तोवर स्वस्थ बसणार नाही असा निर्धार संतप्त जमावाने व्यक्त केला त्यामुळे तणावसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी कौशल्याने परिस्थिती हाताळली आणि नागरिकांनी देखील समंजसपणाची भूमिका घेतल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. आता शांतता आहे. मात्र या पार्श्वभूमिवर पोलिसांनी वेंगुर्ला आणि परिसरात मोठा तगडा बंदोबस्त तैनात केला असून जनतेने शांतता पाळावी, प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन देखील केले आहे. तसेच संशयितांविरोधात २ समाजात धार्मिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली भा.द.वि.क. १५३, ५०५ (२), २९५, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती डी. वाय. एस.पी. संध्या गावडे यांनी पत्रकारांना दिली.
सोशल मिडियावर वादग्रस्त पोस्ट – २२ जानेवारीला अयोध्येत श्री राम ललाची प्रतिष्ठापना उत्साहात संपन्न झाली. रामभक्तांचे शेकडो वर्षांचे स्वप्न साकार झाल्याने साऱ्या देशात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. वेंगुर्त्यांमध्ये देखील रामभक्तांनी शांतातामय मार्गाने आनंद साजरा केला. मात्र याच दिवशी काही समाजकंटकांनी इन्स्ट्राग्राम तसेच व्हॉट्सअॅपवर भावना दुखावतील अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल केल्या. सोशल मिडियावर या पोस्ट काही क्षणात व्हायरल होताच हा हा म्हणता त्या पसरल्या आणि अनेकांच्या संतापाचा पारा चढला.
१० तास आंदोलन – मंगळवारी दुपारी या घटनेचा निषेध करण्यासाठी शहर आणि परिसरातील शेकडो लोकं रस्त्यावर आली. हिंदूत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. पाहता पाहता गर्दी वाढत गेली आणि शेकडोंच्या संख्येने लोकं या पोस्टचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले. शेकडोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेली मंडळी पोलीस स्थानकावर धडकली. मंगळवारी दुपारी ३ वाजता सुरु झालेले हे आंदोलन रात्री १ वाजेपर्यंत सुरु होते. आरोपींना अटक करा असे एकच मागणे या मंडळींचे होते. त्यासाठी त्यांनी तब्बल १० तास आंदोलन केले.
दोघांविरोधात गुन्हा दाखल – दरम्यान, दाखल झालेल्या तक्रारीनुसार वेंगुर्ला पोलीस स्थानकात एक युवक आणि एका युवतीविरोधात तणाव निर्माण होईल अशी कृती करणे, धार्मिक तेढ निर्माण करणे अशा आरोपाखाली भा.द.वि.क. १५३, ५०५(२), २९५, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरु असून शहर आणि परिसरात पूर्णपणे शांतता आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे. डीवायएसपी संध्या गावडे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांनी परिस्थिती कौशल्याने हाताळत संतप्त जमावाशी चर्चा करुन शांतता प्रस्तापित करण्यात यश मिळवले. वेंगुर्लामध्ये आता शांतता असली तरी परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.