मुसळधार पावसामुळे आणि महामार्ग ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे लांजा बाजारपेठेतील नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांना महामार्ग ठेकेदार कंपनी नुकसान भरपाई देणार होती; मात्र त्या आश्वासनावर घुमजाव केल्यामुळे नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत ठेकेदार कंपनी प्रतिनिधीला तहसीलदार कार्यालयातच धारेवर धरले. येत्या दोन दिवसांत नुकसान भरपाई न मिळाल्यास गुरुवारी महामार्गाचे काम बंद पाडू, असा इशारा दिला आहे. मुसळधार पाऊस पडल्यामुळे १ नोव्हेंबरला शहरातील महामार्गावर श्रीराम पुलाजवळील वहाळातील पाणी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास तुंबले. ते पाणी आसपासच्या परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या सहा महिन्यांतील ही चौथी घटना आहे. तरीही ठेकेदार कंपनीने या संदर्भात वेळोवेळी निष्काळजीपणा दाखवला. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त करत नुकसान भरपाईची मागणी केली.
या वेळी नुकसान भरपाई दिली जाईल, असे आश्वासन ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधीकडून नागरिकांना दिले होते. त्या पार्श्वभूमीवर ठेकेदार कंपनीशी संपर्क साधला असता ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधीने घुमजाव केला. त्यामुळे आक्रमक नागरिकांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधीला बोलावून त्याला धारेवर धरण्यात आले. त्या वेळी निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेवेळी ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी नरेश सितलानी यांच्यावर नागरिकांनी प्रश्नांचा भडीमार केला. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे नागरिकांचा पारा चढला. नागरिकांनी ठेकेदार कंपनीला दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे तसेच नुकसान भरपाई ५ नोव्हेंबरपर्यंत मिळाली नाही, तर ६ नोव्हेंबरला महामार्गाचे काम बंद पाडू, असा इशारा दिला आहे.
तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीला राजेश राणे, प्रकाश लांजेकर, अभिजित राजेशिर्के, पंढरीनाथ मायशेट्ये, बाबा धावणे, मंगेश लांजेकर, सचिन लिंगायत, सुरेश करंबळे, सलमान देवानी, मोहम्मद देवानी, मुकरम देवानी, अनिकेत शेट्ये, राजेश भडेकर, नौशाद नेवरेकर, साहिल इसानी, वसीम मुजावर, अब्दुलरहेमान मुजावर, मोहन तोडकरी, बाबू गुरव, रिजवान इसानी आदी उपस्थित होते.
आमदार सामंतांचे आश्वासन – नागरिकांनी आमदार किरण सामंत यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. या वेळी आमदार सामंत यांनी मी मुंबईत असून, दोन दिवसांत लांजात येणार आहे. ठेकेदार कंपनीने आश्वासन दिल्याप्रमाणे नुकसान भरपाई दिली नाही, तर संबंधितांवर कारवाई करू, असेही त्यांनी सांगितले.

