रत्नागिरी महावितरण कंपनीवर वीजबिलाच्या थकबाकीमुळे आर्थिक अडचणीची टांगती तलवार असल्याचे बरेच दिवस कानावर येत आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे मागील वर्षी घरी जाऊन वीज मीटर रीडिंग घेणे थांबवण्यात आले होते. मागील बिलाच्या आधारावरच सरासरी बिल पुढील महिन्यासाठी पाठवण्यात येत होतीत. पण आलेली बिले जास्त रकमेची असल्याने, ग्राहकांना एकावेळी जास्त रक्कम भरणे शक्य झाले नाही. काही ठिकाणी वापरापेक्षा वीजबिल जास्त आल्याची तक्रार ग्राहकांनी नोंदवली आहे. पण जे वीज बिल प्राप्त झाले आहे ते भरावेच लागेल, असे महावितरण कंपनीकडून सांगण्यात आले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ग्राहकांना एसएमएस द्वारे किंवा ऑनलाईन विजेचे मीटर रीडिंग पाठविण्याची सुविधा महावितरणाने उपलब्धता करून दिलेली. पूर्वी येणारे बिल हे ३ महिन्यांनी यायचे, नंतर तो कालावधी कमी करून २ महिने करण्यात आला आणि आता प्रत्येक महिन्याचे बिल देण्यात येते. परंतु, महावितरणाकडूनन हि बिले वितरीत करताना, कोणतीही शहानिशा न करता, अनेकांना वाढीव बिले पाठविल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे महावितरण ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत.
दररोज जिल्ह्यामध्ये महावितरण कोट्यावधी रुपयांची थकबाकी असल्याचे जाहीर करते, मग थकबाकीदारांची नावे जाहीर का करत नाही? कोण यामध्ये आडकाठी करत आहे! अशी चर्चा जनतेमध्ये सुरु आहे. ग्राहकांचे मीटर रीडिंग युनिट कमी पडले असले तरी बिल मात्र भरमसाठ येत असल्याने, लोकप्रतिनिधीनी याकडे लक्ष देण्याची मागणी सामान्य नागरिकांमधून होत आहे. ज्यांनी विजेचा वापरच केला नाही, त्यांच्या माथी हि वाढीव वीज बिल का? संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी जनतेकडून होत आहे.