शहरातील ऐतिहासिक पवन तलाव मैदान शासनाच्या विशेष वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेंतर्गत बंदिस्त करण्यात येणार आहे. यासाठी ठेकेदारामार्फत संरक्षक भिंती उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाला वेग आला असून तेथील प्रवेशद्वार व स्वच्छतागृहांची कामेही केली जाणार आहेत. यामुळे मैदानाला लवकरच नवा साज चढणार आहे. बंदिस्त मैदानामुळे पावसाळ्यात गुरे-ढोरे जाऊन होणारी मैदानाची दुरवस्था काहीअंशी कमी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. शहरातील पवन तलाव मैदानावर विविध क्रीडा स्पर्धा, प्रशासकीय उपक्रम तसेच कार्यक्रम मोठ्या प्रमाणात पार पडतात.
या मैदानाला संरक्षक भिंत नसल्यामुळे पावसाळ्यात गुरे-जनावरे आत शिरतात. त्यामुळे मैदानाची दुर्दशा होते. पावसाळ्यानंतर या मैदानामध्ये कोणतेही शासकीय कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, उपक्रम राबवणे अवघड होते. त्याच्या दुरुस्तीला दरवर्षी खर्चाची तरतूद करावी लागत होती. ही बाब लक्षात घेऊन आमदार शेखर निकम यांनी शासनाच्या विशेष वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेतून हे मैदान विकसित करण्यासाठी निधी मंजूर करून घेतला. त्यांच्या प्रयत्नामुळे हे संपूर्ण मैदान बंदिस्त करण्यासाठी संरक्षक भिंत उभारली जात आहे. हे काम सध्या पूर्णत्वास जात आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांचे मोलाचे सहकार्य या कामी लाभले आहे. या कामाचे भूमिपूजन १० एप्रिलला झाले होते. अवघ्या दोन महिन्यांमध्ये या मैदानाला ४७० मीटर लांबीची संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. या भिंतीच्या सांडपाणी निचऱ्यासाठी बाहेरच्या बाजूने आरसीसी गटारदेखील बांधण्यात आले आहे. या मैदानाला तीन ठिकाणी प्रवेशद्वार आहेत. तसेच स्वच्छतागृहाचीदेखील उत्तम व्यवस्था संबंधित ठेकेदाराने पूर्ण केले आहे.