अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा एक महिन्याहून अधिक काळ संप सुरू आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील २ हजार ९६९ अंगणवाडीमध्ये ३ हजार ६०२ अंगणवाडी सेविका संपात उतरल्या आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यास सुरवात झाली आहे. त्यानंतर जिल्ह्यातील १ हजार ४३४ अंगणवाडी कर्मचारी कामावर रुजू झाल्या आहेत. इतर अंगणवाडी सेविकाही लवकरच हजर होण्याची शक्यता आहे. १ हजार ४५८ अंगणवाड्या बंद असल्यामुळे हजारो बालके अजूनही घरीच आहेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा ४ डिसेंबरपासून बेमुदत संप सुरू आहे.
याची शासनस्तरावर दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात २ हजार ९६९ अंगणवाड्यांना कुलूप लागले होते. या संपामुळे बालकं पोषण आहारापासून वंचित राहिली होती. त्यामुळे शासनाने अंगणवाड्यांचा पंचनामा करून पर्यवेक्षिकांकडील चाव्या ताब्यात घ्या, असे आदेश काढले. या संपामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अंगणवाड्यातील सुमारे ७० हजारांहून अधिक बालके पोषण आहारापासून वंचित राहिली. राज्यभरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे लाभार्थी आहारापासून वंचित राहू नयेत यासाठी आहार पुरवठ्याची, अंगणवाडी केंद्र संचालनाची पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाकडून जिल्हा परिषद बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
जिल्ह्यात एकूण ५ हजार ६९ अंगणवाडी कर्मचारी आहेत. त्यापैकी पूर्वपरवानगीने रजेवर असलेले कर्मचारी ३६ आहेत. सध्या सुरू असलेल्या बेमुदत संपात एकूण ३ हजार ६०२ कर्मचारी सहभागी आहेत. प्रशासनातर्फे केलेल्या आवाहनानुसार १ हजार ४३४ कर्मचारी अंगणवाड्यांवर हजर झाल्या. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण ८६८ अंगणवाड्यांमधील बालकांचा किलबिलाट सुरू झाला आहे.