मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरवात झाल्यानंतर शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या कामाला लांजा शहरातील व्यापारी, नागरिक यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. शहरात महामार्गाच्या भूसंपादनात बाधित होत असलेल्या काही जमीन मालकांना त्यांच्या जमिनीचा मोबदला अद्याप रखडला असल्याने हे काम पूर्ण झाले नव्हते. तसेच महामार्गाच्या कामासाठी शहरातील भूसंपादनामध्ये मोठ्या प्रमाणात बाजारपेठ बाधित होणार असल्याने त्याला कडाडून विरोध करण्यात आला होता.
व्यापारी आणि शहरवासीयांनी केलेल्या मागणीनुसार लांजा शहरात उड्डाणपूल होण्याचे प्रशासनाने मान्य केले होते. त्यानंतरच्या काही वर्षात लांजा शहरात उड्डाण पुलासाठी पिलर उभारणीच्या कामाला सुरवात देखील करण्यात आली परंतु, या तीन वर्षात केवळ चारच पिलर उभारण्यात आलेत. त्यानंतर पासून हे काम पूर्णपणे रखडले होते. अखेर शहरातील रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरवात झाली आहे. कोर्ले फाटा येथून महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच शहरातील हे काम पूर्णत्वास जाणार असल्याने शहरातील नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
संथगतीने सुरु असलेल्या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर, लांजा शहर वगळता अन्यत्र सर्वत्र कामे जोरात सुरू होती. पण लांज्यातील रखडलेल्या कामामुळे महामार्गाची दुरवस्था झाली होती. आणि त्याचा नाहक फटका व्यापारी, वाहनचालक आणि नागरिकांना सहन करावा लागत होता. त्यामुळे हे काम जवळपास पाच ते सहा वर्षे रखडले होते आणि यासाठी जानेवारी २०२२ मध्ये समस्त लांजावासीयांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले होते. अखेर लांजा कोर्ले फाट्यावरून कामाला सुरुवात करून कामाला गती प्राप्त होऊ लागली आहे.

