दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील ठाकरे गटाचे माजी मंत्री अनिल परबांशी संबंधित असलेले वादग्रस्त साई रिसॉर्ट आणि सी कौंच बीच रिसॉर्ट पाडण्यासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी तसेच जमीन पूर्ववत करण्यासाठी येणारा खर्च हा जवळपास ९२ लाख रुपये इतपत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तसा अंदाजपत्रकीय प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. मात्र, यावेळी महसूल, पोलीस सुरक्षा आदी गोष्टींसाठी येणारा अंदाजित खर्च १ कोटीपर्यंत जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
ही दोन अवैध बांधकाम केलेली रिसॉर्ट पडण्यासाठी यापूर्वीही कन्सल्टंटची नेमणूक करुन जाहीर निविदा काढण्यात आली होती. मात्र, कन्सल्टंट कोटेशन न मागवता हे काम सार्वजनिक बांधकाम विभागानेच करावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सा.बां. विभागाला दिले आहेत. त्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाठवण्यात आलेल्या अंदाजपत्रकीय प्रस्तावास मंजूरी मिळाल्यानंतरच निविदा काढून ठेकेदार नेमणूक करुन ही दोघंही रिसॉर्ट पाडण्यात येणार आहेत. मात्र, यासाठी अजून किती कालावधी जाईल हे निश्चित सांगता येत नाही. पण किमान एक ते दोन महिने या कार्यवाहीसाठी लागतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिलेली दिवाळीची डेड लाईन देखील हुकण्याची शक्यता आहे.
सद्यस्थितीत मुरुड येथील साई रिसॉर्ट हे कांदिवली पूर्व येथील रहिवासी सदानंद कदम यांच्या मालकीचे आहे. दापोली पोलिसांनी सी कौंच बीचच्या मालकावर पर्यावरणाची हानी केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केली होती. २५ ऑगस्ट २०२२ रोजी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांनी झोन मॉनिटरिंग समितीच्या अधिकार्यांना अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास सांगितले होते. पाडण्याचा खर्च जमीन मालकांकडून वसूल केला जाणार आहे. दरम्यान, किरीट सोमय्यांनी ज्यांच्यावर हे सगळे आरोप केले आहेत ते शिवसेनेचे अनिल परब यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावत या रिसॉर्टशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे.