चिपळूण येथील गोवळकोट येथील ऐतिहासीक गोविंदगडाच्या पायऱ्यांचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात येत आहे. एकीकडे ऐतिहासिक वास्तू जतन करण्याच्या विविध योजना राबवण्याच्या गोष्टी केल्या जातात तर, प्रत्यक्षात मात्र निकृष्ट दर्जाचे कामकाज केले जात असल्याने, आमदार शेखर निकम यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे. अवघ्या महिनाभरामध्येच या पाखाडीला तडे गेले असून काही ठिकाणी बांधकामही ढळण्याच्या घटना घडल्या आहेत.
याबाबत काही ग्रामस्थ्यांच्या तक्रारीनंतर आज सुरेश कदम, किरण बांद्रे यांनी या पायऱ्यांची पाहणी केली. त्यावेळी ग्रामस्थ्यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे समोर आले. मुळात गोविंदगडावर जाण्यासाठी रस्ता, पाखाडी व्हावी, यासाठी येथील मंडळाबरोबरच स्थानिक ग्रामस्थांचे गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा सुरू होता. दुरवस्था झालेल्या या पायऱ्यांचे काम आमदार निकम यांच्या प्रयत्नांतून जिल्हा नियोजन निधी तत्काळ मंजूर केला. सुमारे २५ लाख रुपयांचे हे काम आहे. सप्टेंबर अखेर प्रत्यक्षरित्या या कामाला सुरुवात करण्यात आली. सुरवातीला काही पायऱ्यांचे काम चांगले झाले. परंतु कालांतराने हे काम नित्कृष्ट पद्धतीचे करण्यात आले, असा आरोप आहे. गोविंदगडाच्या प्रवेशद्वारापासून हे काम सुरू केलेले नाही. पुरेसे पाणी नसल्यामुळे पायऱ्यांच्या कडा तुटल्या आहेत. काही पायऱ्यांचे सिमेंट निखळले आहे.
दरवर्षी शिमगोत्सवामध्ये अवजड पालख्या गडावर नेल्या जातात. त्यामुळे पायऱ्यांचे टप्पे कमी उंचीचे व एकसारखे असणे अपेक्षित असताना पूर्वीच्या पायऱ्यानुसारच बांधकाम करण्यात आले आहे. काही पायऱ्यांना दगडच वापरण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रत्यक्ष ठेकेदाराशी संपर्क साधला तरी समर्पक उत्तर मिळाले नाही, अशी खंत व्यक्त करून हे काम दर्जेदार व्हावे, अशी अपेक्षाही ग्रामस्थानी व्यक्त केली आहे. या निकृष्ट कामाची तक्रार आमदार निकम यांच्याकडे करण्यात येणार आहे.

