राजापूर येथील पासपोर्ट कार्यालय जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी म्हणजेच रत्नागिरीत स्थलांतरित करा, अशी मागणी शिवसेना अल्पसंख्याक सेनेकडून पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली. या वेळी पासपोर्ट काढताना येणाऱ्या अडचणींची माहीतीही त्यांनी पालकमंत्र्यांना दिली. पालकमंत्री सामंत यांची रत्नागिरी शिवसेना अल्पसंख्याक समाजाने शासकीय विश्रामगृहात भेट घेतली. सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यासाठी राजापूर येथे पासपोर्ट ऑफिस सुरू करण्यात आले आहे. त्या ठिकाणी राजापूर येथे मोक्याच्या ठिकाणी रेल्वेस्टेशन नाही, तसेच सर्वच रेल्वेगाड्या तेथे थांबत नाहीत. नेटवर्क, लाईट अशा अनेक समस्याही आहेत. मंडणगड, खेड, चिपळूण, दापोली तालुक्यासाठी हा पल्ला लांब पडत असल्याने अनेकजण पासपोर्टसाठी मुंबई जातात.
रत्नागिरीमध्ये सर्व रेल्वे थांबत असल्याने रत्नागिरी सर्वांच्या सोयीचे ठिकाण आहे. या वेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी लवकरच हे कार्यालय रत्नागिरी येथे सुरू होण्यासाठी कार्यवाही करू, अशी हमी दिली. त्यामुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. हे निवेदन देण्यासाठी अल्पसंख्यांक सेना तालुकाप्रमुख अल्ताफ संगमेश्वरी, फैयाज मुकादम, सुहेल मुकादम, मुसा काझी, अझिम चिकटे, मुज्जू मुकादम, आदिल फणसोपकर, अतिक गडकरी, नाझिया मुकादम, शकील मोडक, समीर झारी, साहिल पठाण, नौमान मुकादम, इल्लू खोपेकर, सचिन शिंदे, दीपक पवार, उबेद होडेकर, रमजान गोलंदाज, जमुरत अलजी, सुहेल साखरकर, नासीर काझी, तुफील पटेल, रिझवान मुजावर, फैसल मुल्ला, अख्तर शिरगांवकर, राजेश तिवारी, इस्तियाख खान उपस्थित होते.