जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नवीन प्रकल्प येऊ घातले आहेत. एमआयडीसीच्या १७५ एकर जागेत २४ नवीन उद्योग सुरू झाले असून, २ हजार २५५ कोटींची गुंतवणूक प्रकल्पांच्या माध्यमातून झाली आहे. यातून सुमारे चार हजार लोकांना रोजगार निर्मिती होणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग बंद असल्याचे चित्र दाखविले जाते; परंतु सुमारे २ हजार १४० उद्योगांपैकी फक्त २७६ उद्योग बंद आहेत. हे प्रमाण १० टक्केच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एमआयडीसी कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अभियंता पी. डी. मलिकनेर, सहाय्यक अभियंता श्री. काकुस्ते, मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, अधीक्षक अभियंता कालिदास भांडेकर आदी उपस्थित होते. सामंत म्हणाले, “विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी १३ बैठका घेतल्या. यामध्ये उद्योग विभागाचाही आढावा घेण्यात आला. यात वर्षानुवर्षे पाडून ठेवलेले २७६ भूखंड परत घेण्याचे आदेश एमआयडीसीला दिले आहेत. आज घेतलेल्या आढाव्यामध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नवीन उद्योग येऊ घातले आहेत.
६ लाख ९८ हजार ५८४ स्वेअर फूट जागेमध्ये विविध २४ नवीन उद्योजकांनी २ हजार २५५ कोटींची गुंतवणूक केली आहे. यामध्ये लोटे येथे हिंदुस्थान कोका कोला, बिवेरजीस प्रा. लिमिटेड कंपनीने ७०० कोची गुंतवणूक केली आहे. याशिवाय रत्नागिरी निवेंडी येथे मँगो पार्क होणार असून यातून ४ हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. दाभोळ खाडीतील प्रदूषणाबाबत होणारे आंदोलन मागे घेण्यात आले. त्यासाठी महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये पाइप दुरुस्तीसाठी २२ कोटी मंजूर केले आहेत. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले.
प्राणिसंग्रहालयासाठी परवानगी – एमआयडीसीमार्फत प्राणिसंग्रहालयाला सेंट्रल झु अॅथॉरिटीकडून परवानगी मिळाली आहे. मालगुंड येथे हे प्राणिसंग्रहालय होणार आहे. जमीन खरेदीसाठी ३ कोटी ८५ लाख रुपये आदा केले आहेत. उर्वरित ७८ कोटी ८७ लाख रुपये तरतूद केली आहे. एमआयडीसी हे काम करणार असून वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेकडे ते वर्ग केले जाणार आहे, असे सामंत यांनी सांगितले.