सलग दोन दिवस ढगाळ वातावरण असल्यामुळे रत्नागिरीतील हापूस बागांमध्ये काही ठिकाणी तुडतुड्याचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्याचे प्रमाण कमी असले तरीही पुढील दोन दिवस असेच वातावरण राहिल्यास आमावस्येच्या कालावधीत मोठ्याप्रमाणात उद्रेक होण्याची भीती बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुन्हा वातावरणात बदल जाणवू लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र दुपारपर्यंत ढगाळ वातावरण होते. मागील आठवडाभर दापोलीपासून राजापूरपर्यंत सर्वत्र थंडीसह दाट धुके पाहायला मिळत होते. चिपळूणसह रत्नागिरीतही सकाळी हवेत दिवसभर गारवा जाणवत होता. मात्र, दिवसभर ढगाळ वातावरणही होते. समुद्र किनारी भागात हलके वारेही वाहत होते. मागील पंधरवड्यात हापूस आंब्याला पोषक वातावरण होते. बहुसंख्य बागांमध्ये पालवी फुटायला लागली आहे.
तर पालवलेल्या कलमांना मोहोर लागलेला आहे. तसेच काही झाडांवर कणीएवढी आणि सुपारीएवढी कैरीही दिसू लागलेली आहे. कैरी लागण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. या स्थितीत वातावरण बदलल्यामुळे तुडतुड्याचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. त्यामुळे बागायतदारांना औषध फवारणी करावी लागणार आहे. मात्र, पालवी कोवळी असलेल्या झाडांवर कीटकांचा मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने बागायतदारांना सतर्क राहावे लागणार आहे. अनेक ठिकाणी मोहोर काळा पडण्याची शक्यता असून त्यातील कणीएवढी कैरी गळून जाण्याची भीती बागायतदारांना आहे. तसे झाले तर त्याचा फटका पहिल्या टप्प्यातील उत्पादनावर होणार आहे.