तालुक्यातील कोंड्ये येथे पाटबंधारे विभागामार्फत लाखो रुपये खर्च करून धरण उभारण्यात आले असून, धरणामध्ये पाणीसाठाही चांगला झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करताना पाईपलाईन्स उखडून टाकली गेल्याने गेली सुमारे सहा वर्ष कोंड्ये ग्रामस्थांना धरणाच्या पाण्यापासून वंचित राहावे लागले आहे. तालुक्यातील कोंड्ये येथे लघुपाटबंधारे विभागातर्फे २००८ मध्ये धरण बांधण्यात आले आहे. या धरणामुळे कोंड्ये येथील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. या धरणामुळे गावातील सुमारे ४४० हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. धरण प्रकल्पाच्या उभारणीनंतर धरणातील पाणीसाठ्याचा सदुपयोग करत येथील ग्रामस्थ उन्हाळी शेती करत आहेत. त्यामुळे धरणातील पाण्यासाठी पिण्याच्या पाण्यासह शेतीद्वारे रोजगार निर्मिती करण्याच्यादृष्टीनेही उपयुक्त ठरत आहे.
या धरणावरून कोंड्ये ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन मार्गाच्या येथून गेलेली असून, महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करताना ती उखडली आहे. त्या भागातील काम पूर्ण झाल्यानंतर तुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती होण्याची ग्रामस्थांची अपेक्षा होती; मात्र ती फोल ठरली आहे. त्यामुळे गेल्या सुमारे सहा वर्षांपासून धरण आणि धरणामध्ये मुबलक पाणीसाठा असूनही पाईपलाईनऐवजी पाण्यापासून वंचित राहावे लागले आहे. दरम्यान, खंडित पाणीपुरवठा पूर्ववत व्हावा या दृष्टीने नादुरुस्त पाईपलाईनचे काम व्हावे, अशी सातत्याने येथील ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे.
त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, ठेकेदार कंपनीचे अधिकारी यांच्याशीही संवाद साधण्यात आला आहे; मात्र संबंधितांकडून त्याची कोणतीही दखल घेतली गेली नाही. प्रशासनाचे दुर्लक्ष आणि महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा मनमानी कारभार याचा नाहक फटका बसल्याबाबत कोंड्ये ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केले जात आहे. नादुरुस्त वा तुटलेली पाईपलाईन तत्काळ दुरुस्त करावी आणि खंडित झालेला पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी कोंड्ये ग्रामस्थांकडून केली जात आहे.