सन २०१२ ते १३ च्या दरम्यान बहुचर्चित अशा कोकणातून समुद्रकिनारी मार्गे जाणाऱ्या सागरी महाम ार्गावरील बागमांडला ते बाणकोट या पुलाच्या कामाचे उद्घाटन तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते मोठा धुमधडाक्यात करण्यात आले होते. त्यावेळी राज्यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेमध्ये होते. छगन भुजबळ महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री हरेश्वर, बागमंडला या ठिकाणी येणार म्हणून भर पावसामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरती डांबर टाकण्याचा प्रताप केला होता. रस्ता ओला असताना देखील त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र नंतर झालेल्या पावसामुळे सदरचा रस्ता उखडून गेला होता. जोरदार पूर्णपणे राजकीय अनास्थेमुळे या पुलाचे बांधकाम अनेक वर्षांपासून रखडूनच राहिले. आता नव्याने होत असलेले पुलाचे बांधकाम देखील चौपदरी करणे आवश्यक आहे. कारण या मार्गावरून खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुलाच्या बांधकामाचा ठेका सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने घेतलेला होता. मात्र सदर कंपनीने केवळ पुलाचे पिलरच उभे करून हे काम अर्धवट सोडल्याची बाब समोर आली आहे. सुरुवातीला या पुलाच्या बांधकामाची रक्कम अंदाजे १८२ कोटी रुपये ठरविण्यात आली होती. मरंतु त्यानंतर या खाडी मधून मोठी जहाजे जातील या कारणाने पुलाची उंची वाढवून जवळजवळ साडेचारशे कोटी रुपयांची तरतूद या पुलाच्या बांधकामासाठी करण्यात आली होती. वास्तविक पाहता मोठी जहाजे जातील, एवढी बाणकोट खादीची लांबी, रुंदी व खोली सुध्दा नाही. त्यासाठी खाडीमार्गातून जाणारे पुलाचे पिल्लर खुप उंचीचे बांधण्यात आले होते. आज मीतीला सर्व बांधलेले पिलर तयार असून देखील ह्या पुलाचे काम अर्धवट सोडून नव्याने पूल बांधण्यात येत असल्याने जनतेमध्ये विविध चर्चाना आले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नवीन जाहीर निविदा काढून पुलाच्या नवीन कामाची निविदा काढली आहे व संबंधित ठेकेदाराने पुलाचे काम सुरू केले आहे.
२०१२ ते १३ च्या दरम्यान सुरू झालेले हे पुलाचे काम २०१५ पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा होती.. जर २०१५ साली या पुलाचे काम पूर्ण झाले असते तर, रायगड व रत्नागिरी जिल्हे एकमेकांना जोडले जाऊन या ठिकाणी पर्यटन व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावरती बहरला असता. घाटमाथ्यावरून कोकणामध्ये येणाऱ्या पर्यटकांना गणपतीपुळेकडून श्रीवर्धन, हरिहरेश्वरकडे येण्यासाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. तर पुण्यातून श्रीवर्धन येथे येणाऱ्या पर्यटकांना गणपतीपुळे किंवा रत्नागिरी या ठिकाणी जाण्यासाठी देखील हा पूल महत्त्वाचा ठरणार आहे. नव्याने सुरू झालेले काम शासनाने लवकरात लवकर पूर्ण करून या ठिकाणच्या पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळावी. या उद्देशाने काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे. अशी मागणी स्थानिकांमधून व्यक्त केली जात आहे.