गेल्या काही महिन्यांपासून बाजारपेठ, मध्यवर्ती बसस्थानक आणि भोगाळे परिसरात हातगाडी, खोकेधारकांच्या अतिक्रमणावर कारवाई सुरू होती. मात्र, आर्थिक वर्षअखेरीस करवसुली मोहिमेमुळे ही कारवाई थांबली होती. आता नगरपालिकेने पुन्हा कारवाई सुरू केली असून, मंगळवारी शहरातील गोवळकोट रोड परिसरातील ६० हून अधिक हातगाडी, खोकेधारकांवर हातोडा उगारला, तसेच काहींना एक दिवसाची मुदत देऊन अतिक्रमण केलेले बांधकाम हटवण्याच्या सूचना दिल्या. येथील नगरपालिकेने दोन महिन्यांपूर्वी बाजारपेठसह उपनगर भागात तसेच चिंचनाका ते पॉवरहाऊस दरम्यान अतिक्रमणविरोधी कारवाई केली होती; मात्र त्यानंतर ही कारवाई थंडावताच पुन्हा त्याच ठिकाणी मोठ्या संख्येने अतिक्रमण झाले होते. रस्त्यालगत खोके उभारून मोठ्याप्रमाणात माल विक्रीसाठी ठेवल्याने पादचाऱ्यासह वाहतूकदारांना देखील त्याचा त्रास सहन करावा लागत होता. याविषयी गेल्या काही दिवसांपासून तक्रारी सुरू होत्या.
याशिवाय मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील अतिक्रमणामुळे मुख्य गटार बुजून गेले होते. त्यामुळे या भागातील सांडपाण्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. गटारे तुंबल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. अखेर नगरपालिकेने संबंधित खोके व हातगाडीधारकांना साहित्य हटवण्यासाठी मुदत दिली होती; मात्र तरीही संबंधितांनी खोकी न हटवल्याने नगर पालिकेने दोन आठवड्यांपूर्वी अतिक्रमण हटाव मोहीम जोरदारपणे राबवली. एवढेच नव्हे तर पुन्हा अतिक्रमण केले तर थेट गुन्हा दाखल केला जाईल, अशी तंबीही दिली. त्यानंतर अद्याप या भागात अतिक्रमण झालेले नाही. यासंदर्भात प्रशासनाने राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेपही खपवून घेतला नाही. परिणामी, बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. नेहमी गजबजणारी व वाहतुकीस अडथळा ठरणारी पानगल्लीदेखील मोकळी झाली आहे.