विविध क्षेत्रामध्ये निधी उपलब्ध करुन देण्याचे काम महाराष्ट्र शासन करतय. त्यातला एक अभिनव प्रकल्प रत्नागिरीमध्ये होतोय. पांढरा समुद्र ते मिऱ्या हा जो साडेतीनशे कोटी रुपये खर्च करुन होणार बंधारा आहे. हा भविष्यात महाराष्ट्रातील नाही, देशातील नाही तर परदेशातील पर्यटकांना देखील आकर्षित करेल. अशा पध्दतीचे पर्यटन स्थळ वर्षभरात साकार करतोय. जिल्ह्यातील विकासात्मक प्रकल्पांच्या वाढीसाठी रत्नागिरीकरांचे सहकार्य आवश्यक आहे. ते सहकार्य करण्याचा संकल्प महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांनी मिळून करु, असे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले. महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त पालकमंत्री डॉ. सामंत यांनी येथील पोलीस परेड ग्राऊंडवर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वज फडकवून मानवंदना दिली. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
यावेळी आपल्या भाषणात पालकमंत्री ना. उदय सामंत म्हणाले की, रत्नागिरी जिल्हा हा साहित्यिकांचा जिल्हा आहे. रत्नागिरी तालुक्यात असलेले केशवसुत स्मारक, ज्या मालगुंडमध्ये केशवसुतांचा जन्म झाला, त्या गावाला पुस्तकांचे गाव म्हणून जाहीर करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला, माझ्या विभागाने घेतला. नुसता निर्णय घेतला. नाही, तर त्याची अंमलबजावणीदेखील झाली आहे.
३६० कोटींचा विकास निधी – गेल्या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ३६० कोटीचा निधी १०० टक्के खर्च केला आहे. या वर्षीदेखील महाराष्ट्र शासनाने अधिकची भर टाकली आहे. तोदेखील आम्ही १०० टक्के खर्च करु, हा विश्वास मी रत्नागिरीमधील तमाम नागरिकांना देतो. रत्नागिरी शहर हे ऐतिहासिक शहर आहे. पर्यटनाच्यादृष्टीने शहराची वाढ व्हावी, यासाठी महाराष्ट्रातील सर्वात देखणी शिवसृष्टी शहरामध्ये उभी राहिली. मला सांगतांना आनंद होतोय ज्या दिवशी या शिवसृष्टीचा लोकार्पण झाला तेव्हापासून आतापर्यंत सुमारे २० हजार महाराष्ट्रातीलं, परदेशातील नागरिकांनी या पर्यटनस्थळाला भेट दिली आहे. छावा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दीडवर्ष आधी शहरामध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यामध्ये आपल्याला यश आले आहे. हजारो पर्यटकांनी पुतळ्याला भेट दिलेली आहे. देशातला पहिला थ्रिडी म ल्टीमीडिया शो हा रत्नागिरीमध्ये तयार केला. सुमारे २० कोटी रुपये खर्च केले आणि या दीड महिन्यामध्ये सुमारे ५ हजार पर्यटकांनी आणि विशेषतः त्याच्यामध्ये विदेशातील पर्यटक आहेत, त्यांनी हा शो पाहिला, असे त्यांनी सांगितले.
कृषी पर्यटनाकडे लक्ष – आरेवारे समुद्र किनाऱ्यासमोर ९६ एकरमध्ये फारमोठे कृषी पर्यटन करण्याच्या मनस्थितीत महाराष्ट्र शासन आहे. एडव्हॅन्चर पार्कसाठी नियोजन मंडळातून पहिल्या टप्प्यात ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, हा संकल्प आपण सर्वांनी मिळून करुया. विविध क्षेत्रामध्ये निधी उपलब्ध करुन देण्याचे काम महाराष्ट्र शासन करतंय आणि त्यातला एक अभिनव प्रकल्प रत्नागिरीमध्ये होतोय. तो म्हणजे, पांढरा समुद्र ते मिऱ्या हा जो साडेतीनशे कोटी रुपये खर्च करुन होणार बंधारा आहे. हा भविष्यात महाराष्ट्रातील नाही, देशातील नाही तर परदेशातील पर्यटकांनादेखील आकर्षित करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्योगांमध्येही भरारी – उद्योग क्षेत्रामध्येदेखील रत्नागिरीने उत्तुंग भरारी घेतली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोकाकोला सारखा प्रकल्प २ महिन्यामध्ये कार्यान्वित होतोय, असे सांगून पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, आपल्या रत्नागिरी तालुक्यात व्हीआयटी सेमी कंडक्टर कंपनी आणि धीरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर आणि निबे डिफन्स क्लस्टर असे ३० हजार कोटींचे प्रकल्प पुढच्या दोन वर्षात उभे राहणार आहेत आणि त्यामधून २० हजार मुला-मुलींना रोजगार मिळणार आहे. या प्रकल्पांच्या वाढीसाठी देखील रत्नागिरीकरांचे सहकार्य आवश्यक आहे. ते देखील सहकार्य करण्याचा संकल्प महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांनी मिळून करु, असे आवाहन ना. उदय सामंत यांनी केले.