गेल्या तीन दिवसांपासून पावसाने लांजा शहरासह तालुक्याला झोडपून काढले आहे. पावसाचा सर्वाधिक फटका हा लांजा शहरातील मुंबई-गोवा महामार्गाला बसला आहे. ठेकेदार कंपनीच्या वेजबाबदार कारभारामुळे व उशिरा सुरू झालेल्या कामांचा फटका लांजा शहराला बसत असून, ठिकठिकाणी मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. आधीच रखडलेल्या गटारे, सर्व्हिस रोडच्या कामामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने त्यातून वाट काढणे पादचारी आणि वाहनचालकांसमोर मोठी समस्या निर्माण होत असतानाच आता मुंबई – गोवा महामार्गावर लांजा शहरात सर्वत्र खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. त्या खड्ड्यांमध्ये पडलेल्या पावसाचे पाणी साचत असून, वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहने या खड्यात आपटत आहेत.
पादचाऱ्यांच्या अंगावर चिखलाचे पाणी उडत आहे. त्याचप्रमाणे सर्विस रोड आणि गटारांच्या कामासाठी खोदलेल्या मात्र अर्धवट स्थितीत असणाऱ्या जागेत पावसाचे पाणी साचून तळी निर्माण झाली आहेत. एकूणच महामार्ग ठेकेदार कंपनीच्या बेजबाबदार कामाचा फटका लांजा शहरातील नागरिक आणि मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी, वाहनचालक यांना सहन करावा लागत आहे.
खडी वाहून रस्ता पुन्हा खड्डेमय – महामार्गावर पडलेले खड्डे भरण्यासाठी कंपनीकडून तात्पुरत्या स्वरूपात खडी टाकून हे खड्डे बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. असे असले तरी मुसळधारपणे पडणारा पाऊस आणि वाहनांची असलेली सततची रहदारी यामुळे ही खडी वाहून जाऊन रस्ता पुन्हा खड्डेमय होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कंपनीचा हा प्रयत्न कूचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे.