शहरामध्ये पूरस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या अर्जुना-कोदवली नदीपात्रातील गाळाचा लोकसहभागातून दोन-तीन वर्षांपूर्वी उपसा करण्यात आला. त्यामुळे नदीपात्राची रूंदी आणि खोलीही वाढली. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता पूरस्थितीमध्ये नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासह मदतीसाठी नगरपालिकेची फायबर बोट सज्ज झाली आहे. बोटीच्या सुस्थितीची पालिकेकडून चाचणीही घेण्यात आली. राजापूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. जैस्मिन, मुख्याधिकारी वैभव गारवे, पोलिस निरीक्षक अमित यादव, पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली फायबर बोटीचे नुकतेच प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी पालिकेचे स्वच्छता निरीक्षक अमित पोवार, मुकादम राजन जाधव, सुशील यादव, प्रणय जाधव, ओंकार तांबे, संदीप कुळी, किशोर धांगट, सागर जोगले, दिनेश पवार, नरेश घुमे आदी कर्मचारी सहभागी झाले होते.
अतिवृष्टी झाल्यास शहरातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नद्यांना दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती असते. शहरातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत होते. शहरातील संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी नगर पालिका मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन सज्ज झाले आहे. पालिकेने संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी संभाव्य नैसर्गिक आपत्ती कृती आराखडा तयार केला आहे. नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आपत्ती नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत राहणार आहे. शासनाच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून उपलब्ध झालेल्या सुमारे ५२ लाख रुपयांच्या निधीतून अर्जुना-कोदवली नदीपात्रातील सुमारे २१ हजार घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे.