महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत कृषी विभागामार्फत आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस, कोकम, चिकू आदी फळपिकांची तसेच बांबू लागवड करता येते. त्यासाठी शंभर टक्के अनुदान उपलब्ध आहे. बांबू लागवडीसाठी ४५० हेक्टरचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील हवामान फळबाग व बांबू लागवडीसाठी पोषक व अनुकूल आहे. शेतीमधून शाश्वत स्वरूपाचे उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनी फळबाग लागवडीकडे वळणे आवश्यक आहे. जून व जुलै महिना हा फळबाग लागवडीसाठी योग्य कालावधी आहे. जूनमध्ये लागवड केलेल्या कलमांची वाढ जोमदार होते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी जून महिन्यामध्ये फळपिकाची व बांबूची लागवड करण्याचा प्रयत्न करावा. फळबाग लागवड करताना शक्यतो सीआरए तंत्रज्ञानाचा वापर करावा. सीआरए तंत्रज्ञानाबाबत संबंधित गावातील सहाय्यक कृषी अधिकारी मार्गदर्शन करतील.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत शेतकरी बांधवांना ५ गुंठे ते २ हेक्टर क्षेत्रापर्यंत फळबाग लागवड करता येते. यामध्ये प्रथम वर्षी ५० टक्के, द्वितीय वर्षी ३० टक्के व तृतीय वर्षी २० टक्के याप्रमाणे अनुदान वितरित केले जाते. अल्पभूधारक म्हणजे २ हेक्टर व त्यापेक्षा कमी जमीनधारणा असलेले शेतकरी लाभ घेऊ शकतात. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना जमीनधारणेची अट नाही. इच्छुक शेतकरी बांधवांकडे रोजगार हमी योजनेचे जॉबकार्ड असणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे, अर्ज व त्यासोबत सातबारा उतारा, ८ अ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, जॉबकार्ड, संमतीपत्र, ग्रामसभा ठराव आदी कागदपत्रे ग्रामस्तरीय साहाय्यक कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावेत. या योजनेच्या अधिक माहितीसाठी साहाय्यक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
फळपिके व अनुदानाची रक्कम – आंबा फळपिकासाठी (१० बाय १०) मीटर अनुदान २ लाख ५ पाच हजार ५१२ रुपये, आंबा (५ बाय ५) मीटर अनुदान देय रक्कम २ लाख ६५ हजार ८५० रुपये, काजू १ लाख ४४ हजार ३२ रुपये, नारळरोपे (बाणवली) १ लाख ६७ हजार ८६६ रुपये, सुपारी २ लाख ६३ हजार ७४० रुपये, बांबू ७ लाख ४ हजार ४४६ रुपये इतके आहे