आम्ही कोणतेही कर्ज घेतलेले नाही, तरी कर्ज भरा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा नोटिसा सहायक निबंधक कार्यालयाकडून आल्याने राजापूर अर्बन बँकेचे खातेदार आक्रमक झाले. तालुका निबंधक कार्यालयात याबाबत बुधवारी सुनावणी घेण्यात आली. यावेळी अधिकारी व खोटी कर्ज दाखवल्याने संतप्त खातेदारांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. राजापूर अर्बन बँकेच्या संचालक किंवा संबंधित अधिकाऱ्यांना कार्यालयात बोलवा, असे खातेदरांनी स्पष्ट करत कार्यालयात गोंधळ घातला. राजापूर अर्बन बँकेतील अनेक खातेदारांना अचानकपणे परताव्यासाठी नोटीसा आल्या. त्यांच्या नावावर लाख २० लाख ते कोट्यवधींची कर्ज घेतल्याचे खातेदारांचे म्हणणे आहे. याबाबत यापूर्वी पोलिस ठाण्यात देखील तक्रार दाखल होऊन एका अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकनेही त्याच्यावर कारवाई करून निलंबित केले. परंतु आता सुमारे रत्नागिरीतील ३ कोटीची कर्ज प्रकरणे थकीत असल्याने संबंधित खातेदारांना निबंधक कार्यालयाकडुन कर्ज भरण्याबाबत नोटिसा गेल्या.
तेव्हा या खातेदारांना हा प्रत्यक्षात न घेतलेल्या कर्जाचा प्रकार पुढे आला. यामुळे संतप्त झालेले, सुमारे ३५ खातेदार बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील तालुका सहायक निबंधक कार्यालयात सुनावणीसाठी हजर झाले. यासाठी राजापूर अर्बन बँकेचे अधिकारी दप्तर घेऊन या कार्यालयात आले होते. सुनावणीसाठी आलेल्या परंतु आपण बँकेकडून कर्जच न घेतल्याचे या सर्व खातेदारांचे म्हणाणे आहे. तरी कर्ज भरा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा नोटिसा या कार्यालयातून पाठवण्यात आल्या होत्या. त्याबाबत आज सुनावणी सुरू झाली. एका खातेदाराच्या नावे तर ८० लाख कर्ज असल्याचे सांगण्यात आले. यापैकी एक कर्जदार संतप्त झाले, त्यांच्या म्हणण्यानुसार बँकेने फक्त वकिलाला इथे पाठवले आहे. परंतु जे बँकेचे संबंधित ‘संचालक किंवा पदाधिकारी आहेत त्यांना इथेही सुनावणीला बोलावलं पाहिजे. नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याने नोटिस बजावलेले कर्जदार आक्रमक झाल्याने कार्यालयात गोंधळ सुरू झाला. सुनावण्या सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होत्या. याबाबत तालुका सहायक निबंधक श्री. पाटील यांच्याशी संपर्क साधला, परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही.

