नगरपालिकेत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना आमदार निकम म्हणाले, नगरपालिकेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त बहादूर शेखनाका ते चिंचनाका या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण व सुशोभीकरण होणे अत्यावश्यक आहे. या कामासाठी प्रयत्न सुरू असून, शासनस्तरावर पाठपुरावा केला जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आगामी जनसंवाद यात्रेच्यानिमित्ताने चिपळूणला येत असून, त्यांची जनसभा होणार नसली, तरी ते सर्वसामान्य नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. शहरातील रखडलेले प्रकल्प तसेच आवश्यक असणाऱ्या विकास कामांबाबत आपण उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमोर मुद्दे मांडणार आहोत.
शंकरवाडी येथे बांधण्यात आलेल्या नलावडा बंधाऱ्यामुळे शहरात पुराचे पाणी शिरण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. मोडक समितीचा अहवालही आता मान्य झाल्याने पूरमुक्तीसाठी विविध उपाययोजनांचा मार्ग मोकळा झाला आहे. पाटबंधारे विभागाकडे २३०० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, त्यालाही मंजुरी मिळेल, असा विश्वास निकम यांनी व्यक्त केला. पवन तलाव मैदानाचे सुशोभीकरण सुरू असून, त्या परिसरातील इमारतींचे पुनर्विकास आणि कुटुंबांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. ग्रॅव्हिटी पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून, शहराच्या विकासासाठी आवश्यक त्या सर्व योजना पुढे नेण्याचा आपला निर्धार असल्याचे निकम यांनी सांगितले.