लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीबाबत निर्माण झालेल्या संशयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. मुंबई येथील मुख्यालयातून ६ वरिष्ठ अधिकाऱ्यांचे चौकशी पथक कंपनीत पाठवण्यात आले असून, या पथकाने नुकतीच प्रत्यक्ष पाहणी केली आहे. या पाहणीचा अहवाल लवकरच सादर केला जाणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी, संपूर्ण प्रक्रियेबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात येत आहे.
इटलीतील प्रदूषणाच्या कारणास्तव बंद पडलेल्या मिटेनी कंपनीतील यंत्रसामग्री, तंत्रज्ञान आणि पेटंट्स लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज या कंपनीने खरेदी करून लोटे येथे आणल्याचा आरोप सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंमुळे पुढे आला होता. या प्रकरणाची दखल घेत उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनीही, कोकणातील निसर्गाला धोका पोहोचणार असेल तर संबंधित कंपनीला उत्पादन सुरू करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले होते.
या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण – मंडळाने गंभीर दखल घेत मुख्यालयातून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक पाठवले. या पथकाने कंपनीतील यंत्रसामग्री, वापरलेले तंत्रज्ञान, खरेदी करण्यात आलेली पेटंट्स तसेच आवश्यक परवाने यांची सखोल तपासणी केली आहे. पाहणी पूर्ण झाल्यानंतर पथक आपला अहवाल सादर करणार असून, त्यानंतर पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या या पाहणीच्या निष्कर्षांबाबत मंडळाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

