राजापूर तालुक्यातील केळवडे येथे बंदूकीची गोळी लागून मृत्यु झालेल्या दिपक उर्फ बाबू राजाराम गुरव याच्या मृत्यु प्रकरणाचा तपास लावण्यात राजापूर पोलीसांना यश आले आहे. राजापूर तालुक्यातील केळवडे येथे जंगलात जखमी अवस्थेत आढळून आलेल्या व सिंधुदुर्ग येथे उपचारार्थ दाखल करण्यात आलेल्या दिपक उर्फ बाबू राजाराम गुरव या प्रौढाचा सिंधुदुर्गहुन रत्नागिरीत उपचारार्थ हलविण्यात येत असताना शनिवारी उपचारापुर्वीच मृत्यु झाला आहे.
वैद्यकीय तपासणी दरम्यान दिपक याच्या डोक्यात बंदुकीचे छरे आढळून आल्याने त्याचा घातपाताने मृत्यु झाल्याची शक्यता वर्तविली जात असून या प्रकरणी प्रथमदर्शनी पाहणाऱ्या पार्वती गंगाराम हर्याण रा. केळवडे यांच्या तक्रारीवरून राजापूर पोलिसांनी अज्ञात विरोधात भा.द.वी. कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
राजापूर पोलीसांनी केळवडे गावातील संजय उर्फ बंडया महादेव मुगे याला अटक केली असून संशयीत आरोपीने गुन्हयाची कबुली दिल्याची माहिती राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी बुधवारी पत्रकारांना दिली आहे. त्याला बुधवारी सायंकाळी राजापूर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचेही परबकर यांनी सांगितले.
गावात गेले काही महिने सुरू असलेल्या दोन गटातील देवस्थान वादातुन हा प्रकार घडला आहे काय याबाबतही पोलीस तपास करत असल्याच परबकर यांनी सांगितले. संशयिताकडे बेकायदेशीर एका काडतूसीची बंदूक असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्याला चौकशीसाठी पोलीस स्थानकात बोलावण्यात आले. चौकशीत त्याच्यावर संशय बळावल्याने पोलिसांनी अजून चक्रे फिरवल्यावर त्याने गुन्हा मान्य करून याच बेकायदेशीर बंदुकीने त्याने गुन्हा केल्याचे स्वत: मान्य केले.