रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या भुरट्या चोरांचा सुळसुळाट झालेला पाहायला मिळत आहे. एक दोन दिवस आड काही ना काही तरी फसवणुकीचे किंवा चोरीच्या वार्ता कानावर येऊ लागल्या आहेत. सध्या कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे बाजार, लहान मोठी दुकाने, पान सुपारी टपरी, चहा वडापावच्या टपऱ्या सुद्धा संपूर्ण दिवस सुरु झाल्या आहेत.
अशीच एक फसवणुकीची आणि चोरीही घटना एका टपरी चालकासोबत घडली. टपरी सुरु असताना, आणि साधारणपणे रस्त्यात कमी वर्दळ, पण टपरीवर गर्दी असल्याचे निमित्त साधून, एक अर्जंट फोन करायचा आहे असे सांगून टपरी चालकाचा मोबाईल फोन घेऊन एक अज्ञात फरार झाला आहे.
कोरोनामुळे कोणत्याही गोष्टीचे पेमेंट करण्यासाठी सध्या सगळीजण ऑनलाईन यंत्रणेचा वापर करताना दिसतात. त्यामुळे मोबाईल हँडसेट सह मोबाईल मधील गुगल पे ,फोन पे मधील रक्कम असा १० हजार ५०० रुपयांवर डल्ला मारणाऱ्या एकावर येथील स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २० रोजी महामार्ग वरील भरणे शिंदे वाडी नजीकच्या पान टपरीवर घडला.
याबाबत सुनील गणपत भुवड वय ४८, रा. भरणे आठवडा बाजार यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यांच्या मालकीच्या असलेल्या पान टपरीवर एक अज्ञात इसम येऊन मला एक अर्जंट फोन करायचा आहे असे सांगून त्याने भुवड यांचा फोन घेतला व त्या ठिकाणी गर्दीचा फायदा उचलत पलायन केले. दरम्यान या मध्ये ६ हजार किंमतीचा मोबाईल व फोन मधील गूगल पे, फोन पे मधील ४ हजार ५५० रुपयांची रक्कम लूटली असल्याचे तक्रारी मध्ये नमूद करण्यात आले आहे