आंबोली घाटात ओव्हरटेक करताना समोरच्या गाडीचा अंदाज न आल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रकच्या चाकाखाली चिरडून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचं नाव समीर शशिकांत जाधव रा. वेताळ-बांबर्डे, ता. कुडाळ असं आहे. हा अपघात मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आंबोली नाना पाणी वळणावर झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुबारक शेख हे ट्रक घेऊन रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास कोल्हापूरच्या दिशेने जात होते. यावेळी समोरून भरधाव आणि चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट ट्रकच्या खाली आली. यावेळी ट्रकचे चाक समीर जाधव याच्या शरीरावरून गेले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या समीरचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताबाबत मुबारक हुसेन शेख वय ४२, रा. चंदगड या ट्रकचालकाने दिलेल्या तक्रारीनंतर आंबोली पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. हा अपघातामध्ये इतका भीषण होता की, दुचाकीस्वार समीर जाधव याच्या शरीराचे जागीच दोन तुकडे झाले. तसच दुचाकीवर मागे बसलेला त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. मित्राचा समोर असा दुर्दैवी अंत झालेला पाहून त्याला एकदम धक्का बसला आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच आंबोली पोलीस ठाण्याचे हवालदार दत्ता देसाई आणि सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तत्काळ मदतकार्य सुरू केले. अपघातात जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला उपचारासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. डोळ्यासमोरच मित्राने प्राण गमावल्याने जखमीला मानसिक धक्का बसला असल्याची माहिती मिळाली आहे. त्या पाठी बसलेल्या मित्राला सुद्धा गंभीर दुखापत झाली आहे.