सध्याच्या कोरोनाच्या काळात सगळीकडे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. मुलांचे शिक्षण, नोकरी, खरेदी विक्री सर्व ऑनलाईन झाली आहे. कोरोनाच्या अचानक उद्भवलेल्या संकटामुळे कित्येक जणांनी आपल्या जवळची, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी अनेकांना गमवलं आहे. त्यामुळे कुठेतरी जीवनामध्ये नैराश्येचे वातावरण निर्माण झालेले आहे, परंतु, झालेल्या वाईट गोष्टी अथवा आलेला वाईट काळ विसरून पुनः धीरोदत्तपणे उभे राहणे गरजेचे आहे. अशाच आशयाच्या एका चित्रपटाचे संकलन रत्नागिरीतील एका तरुणाने केले आहे.
रत्नागिरीतील निखील पडावे याने पुनश्च हरीओम या चित्रपटाचे स्वतंत्र्यपणे संकलन केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चित्रपट संकलक म्हणून काम करणारा निखील हा पहिलाच तरुण असेल. याआधीही त्याने लॉकडाऊनच्या काळामध्ये स्थानिक कलाकारांसह वैभव मांगले यांच्यासोबत एक डाव भुताचा हि मालिका बनवली होती. कोरोना, लॉकडाऊन, सगळे व्यवहार ठप्प, सगळे घरी गप्प अशी अवस्था असताना कुठेतरी पुन्हा ताजेतवाने होऊन जीवनाचा श्रीगणेशा करणे गरजेचे आहे. या विषयवार आधारित चित्रपट या कोकणातील निखिल पाडावे आणि प्रथमेश भाटकर यांनी अपार कष्ट करून तयार केला आहे. निखिल पाडावे यांनी एडिटींगचा तसेच प्रथमेश भाटकर यांनी अभिनयाचा उत्तम दर्जा दाखविणारा एक उत्तम चित्रपट पुनःश्च हरी ओम आपल्या भेटीला आणला आहे.
फ्रेमएलमेंट्स मीडिया अँड एंटरटेनमेंट आणि झी टॉकीज प्रस्तुत पुनःश्च हरी ओम हा चित्रपट ११ जुलै २०२१ रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता झी टॉकीजवर प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटात स्पृहा जोशी, वंदना वाकनिस-सरदेसाई, विठ्ठल काळे, निता शेंडे, संजय कुलकर्णी, प्रथमेश भाटकर, देवेंद्र गायकवाड हे अतिशय मेहनती आणि दिग्गज कलाकारांनी काम केले आहे. सध्या यु ट्यूबवर या चित्रपटातील गाणेही प्रदर्शित झाले आहे. निखिल पाडावे आणि प्रथमेश भाटकर यांची या चित्रपटामागील मेहनत नक्कीच प्रत्येक रत्नागिरीकराला अभिमानास्पद आहे.