कोरोनाच्या महामारीमध्ये दिवसागणिक कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. लॉकडाऊन, कडक संचारबंदी एक ना अनेक प्रकारच्या योजना कोरोना नियंत्रित करण्यासाठी सरकार, जिल्हा प्रशासन राबवत आहे. खाजगी व्यापारांसकट काही शासकीय कार्यालयेही बंद ठेवण्यात आली होती. तर काही शासकीय कार्यालयांमध्ये निम्म्या कर्मचाऱ्यांनाच बोलावण्यात येत आहे. रत्नागिरीतील निर्बंध चौथ्या टप्प्यामध्ये शिथिल करण्यात आल्याने अनेक व्यवसाय आणि कार्यालये सुरू करण्यात आली आहेत.
लॉकडाऊन मध्ये राजापूर पोस्ट कार्यालयात तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेले पासपोर्ट कार्यालय बंद ठेवण्यात आले होते. परंतु, आत्ता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांचा पासपोर्ट काढून विमानप्रवास करण्याचे स्वप्न साकारायला मदत होणार आहे.
कोरोनाचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी बंद असलेले पासपोर्ट कार्यालय सुरु झाल्यानंतर गेल्या पाच दिवसांमध्ये एकूण ५१ लोकांनी पासपोर्टसाठी नाव नोंदणी केल्याची माहिती पासपोर्ट कार्यालयातून समोर आली आहे. कोकणवासीयांना सुद्धा परदेशवारीचा आनंद घेता यावा यासाठी पासपोर्ट काढण्याची सुविधा कोकणातील लोकांना स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावी यासाठी हे पासपोर्ट कार्यालय इथे उघडण्यात आले. तीन वर्षांपूर्वी उघडलेल्या या कार्यालयातून या दोन्ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक लोकांची पासपोर्टची कामे होऊन, अनेकजण परदेशवारी सुद्धा करून आलेत.
कोरोनाच्या पॉझिटीव्हिटी दर कमी झाल्याने रत्नागिरी चौथ्या टप्प्यामध्ये अनलॉक करण्यात आली. त्यामध्ये राजापूर मधील पासपोर्ट कार्यालय उघडण्यात आले. त्यामुळे कोरोनामुळे अडलेली पासपोर्ट नवीनकाढणार्यांची कामे मार्गी लागली आहेत. त्याचप्रमाणे काही जणांची पासपोर्ट वैधता संपल्याने, नुतनीकरण करायचे राहिले असल्यास ते सुद्धा आता शक्य होणार आहे.