रत्नागिरीला जोडणाऱ्या महामार्गांवर एक दिवस आड अपघातांची मालिका सुरूच आहे. अवजड वाहनांसंदर्भातच अनेक अपघात घडून येत असल्याचे समोर आले आहे. कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात गुरुवारी एक ट्रकचे नियंत्रण सुटून डावीकडील डोंगरकड्यावर आदळून त्यामध्ये एक महिला जागीच गतप्राण झाली आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. ट्रकचा चालक फरार झाला असून, याबाबतची मिळालेली माहिती अशी कि, ट्रक एमएच ११- डी डी ०९६७ कोल्हापूरहून जयगडकडे चालला असताना, त्यामध्ये रत्नागिरीकडे जाणारे काही प्रवाशी बसले होते. हा ट्रक आंबा घाटात आलाआणि नेमक त्यावेळीच एका चक्री वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रक घाटातील डाव्या बाजूच्या डोंगरकड्यावर जोरदार आपटला.
या अपघातात त्यातील प्रवाशी महिला सोनाबाई सखाराम लवंडे, वय ५८ या जागीच ठार झाल्यात. त्यातील दुसरे प्रवाशी ज्योतीबा बाबुराव लवंडे, वय ५२ हे गंभीर जखमी झाले आहेत. या ट्रकमध्ये वासोळे, जि. सातारा येथील एकाच कुटुंबातील आई, वडील, बहीण, मावस बहीण असे नातेवाईक बसले होते. त्यातील रामकृष्ण सखाराम लवंडे, सोनाक्का बाबुराव लवंडे, स्वाती प्रदीप पिसाळ, आरती योगेश झरंडे यांना किरकोळ मुका मार लागला आहे.
दरम्यान अपघाताची माहिती क्षेत्र नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या हातखंबा येथील रुग्णवाहिकेला मिळाली. ती तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यातून मृत व जखमींना साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. पुढील उपचार त्यांच्यावर सुरु आहेत. पोलीस देखील फरारी चालकाचा माग घेत असून, यंत्रणा कामी लागली आहे.