राज्यात नवीन सरकार आल्यापासून नवनवीन काही ना काही उलथापालथ घडतच आहे. काळ रात्री उशिरा राज्य सरकारने राज्यातील ४४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये रत्नागिरीत दोन प्रमुख अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी आणि जि.प. मुख्याधिकारी यांची बदली करण्यात आली आहे. कोरोना काळामध्ये विशेष कामगिरी करत जिल्ह्याला सावरणाऱ्या जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची अवघ्या सव्वा वर्षांमध्येच बदली करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची नांदेड येथील वाघाला महानगरपालिका येथे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून बदली झाली आहे. यांच्या जागी पुणे येथील एमएससीईआरटीचे संचालक देवेंद्र सिंग हे रत्नागिरीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
पर्यावरणप्रेमी असलेले जिल्हाधिकारी पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पर्यटनदृष्ट्या जिल्ह्याच्या विकासावर भर दिला. गोवा, केरळप्रमाणे रत्नागिरी किनाऱ्यावही पर्यटन वाढावे यासाठी किनाऱ्यांच्या स्वच्छतेसह विकासासाठी प्रयत्न केला. कोकणात जी नैसर्गिक संपत्ती आहे त्याच्याच जोरावर विकास साधण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले.
रत्नागिरीला लाभलेला उत्कृष्ट समुद्र किनारा लक्षात घेता, बॅकवॉटर टूरिझम वाढीवर त्यांनी जोर दिला; परंतु काही गोष्टींमुळे त्याला अपेक्षे प्रमाणे यश मिळाले नाही. त्यानतंर त्यांनी जिल्ह्यात प्लास्टिक मुक्तीचा निर्धार केला. विविध संस्था, व्यापारी, व्यावसायिक आदींची बैठक घेऊन त्यांनी त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांपासून एकल प्लास्टिकवर कडक कारवाई करण्यात येत आहे. चिपळूणला आलेल्या महापुराला तोंड देण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा सर्वाधिक वापर त्यांनी केला. एका ठिकाणाहून जिल्ह्यात आपत्तीच्या कक्षेत असलेल्या गावांना सूचना देणारी यंत्रणाही त्यांनी उभी केली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांचीही बदली झाली असून, त्यांच्या जागी किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती पुजारी यांची नियुक्ती झाली आहे. जाखड यांनी अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय साधून जिल्हा परिषदेचा उत्तम कारभार हाकला. जिल्हा नियोजनकडून येणाऱ्या निधीचा योग्य विनियोग केला. कोरोना काळातही जास्तीत जास्त निधी खर्ची टाकण्यात त्यांच मोलाचे योगदान होते. जलजीवन मिशन, स्वच्छता अभियान, महिला बचतगटांना उभारी देणे असे विविध उपक्रम त्यांनी या कालावधीमध्ये य़शस्वी दिले. कोरोना लसीकरण अगदी डोंगराळ भागात पोहचवण्यासाठी आरोग्य विभागासह जिल्हा परिषदेच्या सर्व यंत्रणांचे त्यांनी नियोजन केले होते.