दीर्घकाळ रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील राष्ट्रीय आरवली ते हातखंबादरम्यानचे चौपदरीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील महिनाभरात रस्त्याचे काम जवळपास काम पूर्ण होईल; मात्र उड्डाणपुलाचे काम शिल्लक राहणार आहे त्यासाठी किमान वर्षाचा कालावधी लागेल. जूनमध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला अडथळे निर्माण झाले नाहीत तर नियोजित वेळेत हा मार्ग पूर्ण होईल, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण सुरू झाल्यानंतर आरवली ते हातखंबादरम्यानचे काम सुरुवातीपासून वादात सापडले होते. अनेक कंपन्यांनी येथील काम अर्धवट सोडले. त्यामुळे संपूर्ण महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असले असताना आरवली ते हातखंबादरम्यानच्या कामाला उशीर झाला आहे. मागील वर्षभरात या भागातील कामाला गती आली आहे.
मागील पावसाळ्यापूर्वी रस्त्याची एक मार्गिका पूर्ण करण्यात आली होती. पावसाळ्यानंतर दुसऱ्या मार्गिकेचे काम सुरू करण्यात आले. डोंगरकटाई करून तेथील मातीने सखल भागात भराव करण्यात आला. काही ठिकाणी मोऱ्यांचे बांधकाम करण्यात आले. काही ठिकाणी संरक्षक भिंती बांधून रस्त्याची रूंदी वाढवण्यात आली आहे. संगमेश्वरची बाजारपेठ सोडल्यानंतर काही अंतरावर सव्वाशे ते दीडशे फूट लांबीची संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. त्या ठिकाणी मातीचा भराव करून रस्त्याची रूंदी वाढवण्यात आली आहे. संगमेश्वर रेल्वेस्थानकाच्या पुढेही डाव्या बाजूला संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे. आरवलीपासून उक्षी फाट्यापर्यंत दुतर्फा रस्त्याचे सिमेंट काँक्रिट करून झाले आहे. हातखंबापर्यंत एक मार्गिका पूर्ण झाली आहे. दुसऱ्या मार्गिकेचे काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.