बनावट, कालबाह्य आणि अनधिकृत बियाण्यांच्या विक्रीस पायबंद घालण्याच्या उद्देशाने शासनाने आता कठोर पावले उचलली आहेत. त्यामध्ये बियाणे विक्रीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कृषी विभागाकडून देण्यात येणारे सत्यप्रत बियाणे आता साथी पोर्टलवर नोंदणी करूनच दिले जाणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना प्रमाणित आणि योग्य खत उपलब्ध व्हावे आणि बियाणे खरेदीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून तालुका कृषी विभागाने तालुकास्तरीय गुणवत्ता नियंत्रण कमिटी गठित केल्याची माहिती तालुका कषी अधिकारी अनिल गावित यांनी दिली. या व्यतिरिक्त भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, भरारी पथके कार्यान्वित झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून यावर्षीच्या खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. शेतांमधील शेतीच्या मशागतीची कामे अंतिम टप्प्यामध्ये आली असून, खरीप हंगामाच्या पूर्वतयारीमध्ये शेतकरी गुंतला आहे.
त्यामध्ये बियाणे, खतेखरेदीचे नियोजन शेतकऱ्यांकडून केले जात आहे. अनेक कंपन्यांकडून शेतकऱ्यांना विविध जातीच्या भातबियाण्यांची विक्री केली जाते; मात्र, त्यामध्ये काहीवेळा बोगस बियाण्याची विक्री होऊन शेतकऱ्याची फसवणूक होते. बनावट बियाण्याच्या वापरामुळे रोपांची पुरेशी उगवण न झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. याबाबतच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून केल्या जातात. शेतकऱ्यांच्या बियाण्यांबाबत तक्रारी येऊ नये, त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी स्वतंत्र प्रणाली कार्यान्वित केली आहे. त्यानुसार आता सर्व प्रकारचे बियाणे साथी पोर्टलवरून विक्री करण्याचे बंधन कृषी विभागाने सर्व कंपन्यांना घातले आहे. त्या द्वारे प्रमाणित केलेल्या बियाण्याची विक्री होणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांची बियाणे खरेदीमध्ये फसवणूक होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
बियाणे कंपन्यांसाठी बंधने – कृषी विभागाने बियाण्यांसाठी काही बंधने करताना काही गुणवता निकष लागू केले आहेत. त्या निकषांची पूर्तता केलेली असावी. बियाण्यांची उगवणक्षमता, टक्केवारी, शुद्धता आणि आर्द्रता ही कृषी विभागाने निश्चित केलेल्या मानांकनानुसार असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बियाण्यांसाठी आवश्यक ते माहितीचे लेबलिंग करणे आवश्यक आहे.