शिवसेनेच्या नेतेपदी आमदार भास्कर जाधव यांची निवड झाल्यावर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाविरोधात दंड थोपटले आहेत. सेनेला संजीवनी देण्यासाठी आणि शिवसेना एकजीव करण्यासाठी ते गणेशोत्सवानंतर संपूर्ण राज्याचा दौरा करून कानाकोपरा पिंजून काढणार आहेत, अशी माहिती त्यांनी स्वत: दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला भलेमोठे खिंडार पडले आहे. शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी ३९ आमदार एकनाथ शिंदे यांनी फोडले. विशेष म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेसाठी दिवसरात्र एक करणार्या आमदारांची संख्या बंडखोरीमध्ये सर्वाधिक आहे.
ठाकरे गटातील शिवसेनेत गळती सुरू असताना युवानेता आदित्य ठाकरे राज्याचा दौरा करत आहेत. पावसाळ्यानंतर उद्धव ठाकरे दौरा करणार आहेत. मात्र गणेशोत्सवानंतर भास्कर जाधव यांनी राज्याचा दौरा करण्याची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेतील काही बंडखोर आमदारांनी अचानक केलेल्या बंडामुळे, राज्यातील अख्खी शिवसेना ढवळून निघाली. अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी तेथील शिंदे गटात सामील झालेल्या स्थानिक आमदारांसोबत जाण्याचे निश्चित केल्याने गावागावात पोहोचलेल्या शिवसेनेला हळूहळू भगदाड पडू लागले.
कोकणात देखील शिवसेनेच्या नेतृत्वावर नाराज होत अनेक शिवसैनिकांनी शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांना पाठींबा दर्शवल्याने, कोकणातून सुद्धा शिवसेना संपुष्टात येते आहे कि काय अशी परिस्थिती निर्माण झालेली. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जे कोकणातील नेते अजूनही शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले आहेत त्यांना जबाबदारीची पदे देय करून, शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत.